( विजय जगताप)
कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या मावळ तालुक्यातील नागरिकांच्या मदतीसाठी आमदार सुनिल शेळके यांनी रेशनकीट, तयार जेवण, व घरपोच भाजीपाला अशा तीन पातळीवर भव्य अन्नदान साखळी उभारून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
कोरोनामुळे मावळ तालुक्यातील हातावर पोट असलेले गोरगरीब , स्थलांतरित मजूर, व रोजगार बुडालेल्या तालुक्याच्या दूर्गम भागातील हजारो नागरिकांना आता उपाशी रहायची वेळ येऊ नये यासाठी आमदार शेळके यांनी मागील आठ दिवसांपासून अन्नसाखळीची यंत्रणा उभारली आहे.
या प्रक्रियेतील महत्वाचा भाग असलेल्या एक महिन्याचे रेशन असलेले २० हजार किट गरीब नागरिकांना दयायला उदयापासून ( सोमवार १३ एप्रिल ) सुरूवात होत आहे . या कीटमध्ये तयार गव्हाचे पीठ, साखर, तेल, मीठ-मिरची, डाळ, साबण चहा पावडर व दररोज लागणा-या वस्तूंचा समावेश आहे. साधारणपणे एका किटमध्ये १२०० रूपयांच्या वस्तू असणार आहे.
सहा दिवसांपूर्वी लोणावळयातील प्रत्येक घरात भाजीपाला( कांदे, बटाटे,वांगी, टोमॅटो व चार भाज्या) वाटण्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
तर देहूरोड येथे रेशनच्या २२०० किटचे वाटप पूर्ण झाले होते.सध्या तळेगाव येथे दररोज १ हजार लोकांचे दोन वेळचे जेवण तयार करून ते मजूर व गोरगरिबांना पार्सल स्वरूपात कार्यकर्ते वितरीत करतात.
आता रेशनचे २० हजार किट सोमवारपासून मावळातील प्रत्येक गावातील गरिबांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.त्यामध्ये वाडी, वस्ती, पाडे, पठारावरील गावे , द-या-खो-यातील गावे या अन्नसाखळीत जोडली आहे. यासाठी तहसीलदार, ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घेऊन त्यांच्या अहवालानूसार व मागणीनुसार हे वाटप आता होणार आहे.