( विजय जगताप)
“ आता मला बघून तुम्हाला वाटेल ..हा ..बाबा, आता काय नवीन सांगायला आलाय, हे ..पहा.. मास्कशिवाय कोणीही बाहेर पडायचं नाही, आणि अत्यावश्यक कामासाठी जर बाहेर गेलात तर आल्यानंतर मास्क लगेच धुवायचा, तो पुन्हा वापरता येतो.यासाठी घरातील स्कार्फ, मोठा कापड,रुमाल याचादेखील तुम्ही वापर करू शकता” हि वाक्ये आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची..!
राजकीय नेत्यासारखं जाकीट नाही, कुर्ता नाही, बंद गळयाचा सुट नाही की स्टार्च केलेली शुभ्र वस्त्रे नाही.साधीच शर्ट , पॅन्ट घालत त्यांचा असलेला सहज वावर, वडिलधा-या माणसांसारखी समजून सांगण्याची पध्दत पाहून कोरोनाच्या या संकटरूपी काळातही उध्दव ठाकरे मात्र राज्यात कमालीचे लोकप्रिय झाले असल्याचे राजकीय निरीक्षकांचे व अभ्यासकांचे निरीक्षण आहे.
कोरोनासंबंधी जनतेला माहितीवजा निवेदन द्यायला उध्दव ठाकरे हे ५ वेळा टिव्हीवर आल्याची नोंद आहे.आज ( शनिवार ११ एप्रिल )त्यांनी टिव्हीवर येऊन लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवत असल्याची केलेली घोषणा गंभीर असूनही त्यांची शब्दरचना मुदृ, संयमी वास्तवाची जाणिव देणारी व मनाला भिडणारी होती.
उध्दव ठाकरे यांना लोकांनी यापूर्वी पाहिले ते जाहीर सभा, निवडणूक प्रचार ,दसरा मेळावा व पत्रकार परिषदांमधून..! वास्तविक ठाकरे या नावाचे असलेले वलय व गारूड गेली ५० वर्ष या राज्याने अनुभवले आहे.२६ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्री झालेले उध्दव ठाकरे हे राज्याच्या सर्वोच्च पदावर येऊन देखील त्यांनी आपल्या ड्रेसिंग कोडमध्ये बदल केला नाही हे विशेष..!
पाच दिवसांपूर्वी त्यांनी ड्रायव्हरला सुट्टी देऊन स्वत: कार चालवत मंत्रालयात ते आल्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यांचे संयत बोलणे व जमिनीवर असणे सर्वांना अपील झाले.
मार्चमध्ये पहिल्यांदा टिव्हीवर आल्यानंतर “ तुम्ही घरी रहा खंबीर, शासन आहे गंभीर” असे यमक जुळवणारा आत्मविश्वासी सूर आज पुन्हा एकदा त्यांनी “ तुम्ही खबरदारी घ्या , आम्ही जबाबदारी घेतो” असे यमक जुळवित नागरिकांच्या ह्दयसिंहासनावर मात्र त्यांनी स्थान निर्माण करण्यात यश मिळविले आहे.