देशाचे प्रमुख एक अशास्त्रीय कृती १३० कोटी भारतीयांना करायला सांगतात आणि तर्काला, बुध्दीला पटत नसताना देखील केवळ ‘पंतप्रधानांनी सांगितलंय ‘म्हणून लोक त्याची अंमलबजावणी करतात. मात्र ‘दिवे का लावायचे’? ‘त्याने कोरोना जातो का’ ? या प्रश्नांची फोड व उकल सांगता न येणा-या पालकांमुळे करोडो मुलांच्या चौकस बुध्दीला अंधविश्वासाने काल मारलेला विळखा या मुलांच्या आयुष्यभर आता प्रश्नांकित करून राहणार आहे.
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग हवालदिल झाले असताना पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ५ एप्रिलला ९ वाजता ९ मिनिटे लाईट बंद करून दिवे लावायचे असे चार दिवसांपूर्वी टिव्हीवरून देशाला संबोधित करताना सांगितले. मागील महिन्यात २२ मार्चला एक दिवसाचा करफ्यू संपल्यानंतर ‘रात्री लोकांनी टाळया वाजवायच्या व थाळीचा निनाद करायचा ‘असा एक प्रयोगही मोदींनी सांगितल्यानुसार देशवासियांनी केला देखील.., परंतू काल(५ एप्रिल ) दिवे लावण्याचा त्यांचा संदेश विशेषत: लहान मुलांपुढे अनेक प्रश्न, शंका व बुध्दीला सतावणारा ठरल्याचे दिसून आल्याचे चित्र आहे.
दिवे लावण्याबरोबरच ९ वाजताच का? आणि ९ मिनिटेच का? या मुलांच्या उपप्रश्नांनी तर पालकांच्याच डोक्यातील टयूबलाईट मंद करून टाकल्या होत्या. संघ व भाजपच्या एका वर्तुळातील माझ्या एका मोठया मित्राने तर “ही कृती आम्हालाही पटली नाही, पण याविषयी बोलताही येत नाही” असे म्हणत आपली मळमळ व्यक्त केली.
दिवे लावण्याबरोबरच बहुसंख्य ठिकाणी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाचा आलेला उमाळा तर कारगील युध्द जिंकल्यानंतर झालेल्या परिस्थितीसारखा भासत होता. ‘भारत माता की जय, वंदे मातरम, कोरोना गो’ या घोषणा व गगनभेदी किंकाळया पटत नसतानाही साथ दयाव्यात तसे लोक देत होते.
सोशल मिडियात दिवे लावण्याच्या विरोधात असलेला मोठा वर्ग निर्माण झाला असला तरी विशेष म्हणजे हा मुद्दा खोडून काढण्याची तसदी मात्र दिवे समर्थकांनी घेतली नाही की त्यांना उत्तर देता येत नव्हते याचे आश्चर्य होते. रात्री आठपासूनच मात्र दिवे समर्थकांच्या दिव्यांची सजावट ताटासहीत व्हाॅटसअपवर फिरू लागली होती. तर दिवे विरोधक जीव गेला तरी लाईट घालणार नाही या स्थितीत होते. जाणवणारी एक मुख्य बाब म्हणजे या दिवे लावणे प्रकारास भाजप विरूध्द विरोधक असेही स्वरूप आल्याचे पहावयास मिळाले .