( विजय जगताप)
कोरोनामुळे लाॅकडाऊन , करफ्यू यामुळे रोजगाराला गेल्या दहा दिवसांपासून मुकलेल्या शेकडो हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचा केवळ भूकेसाठीचा आक्रोश आता या संकटातून वाचायचे की यांना वाचवायचे यासाठीच्या आतडी पिळवटून टाकणा-या कहाण्या आज दिसून आल्या.
बातमी खासच्या प्रतिनिधीने शहरातील रमाबाईनगर,पत्राशेड,अण्णासाहेब मगर झोपडपट्टी,संजय गांधी नगर,काळा खडक येथील झोपडपट्टयांमध्ये जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.भूकेची आग, त्यामुळे होणारी कुटूंबाची ओढाताण या मंडळींना किती लाचार व कासावीस करते आहे हे दृश्य दिसून आले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचे सरकारचे आदेश अाहेत. त्या प्रमाणे या झोपडपट्टयांमध्ये असलेली छोटी किराणा मालाची दुकाने उघडी होती मात्र १० रुपयांचे तेल, पावशेर तांदूळ, दहा रूपयाची साखर अशा स्वरूपात महिला खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी येत-जात होत्या. कोरोनामुळे काम बंद,ठेकेदार उचल देण्यास हात झटकतोय, आणि दुकानदार ऊधार देत नाही अशा संकटात मजुरी करणारा वर्ग सापडला आहे.
रेशनवर धान्य देण्याच्या सरकारी घोषणेची तीन दिवस होऊनही कार्यवाही अदयाप होऊ शकलेली नाही.आजमितीस शहरात ६५ च्या वर झोपडपट्या असून गरीब, कष्टकरी, श्रमिक वर्ग येथे वास्तव करतो.
या संकटकाळात मदत करणारे कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था आपले संभाव्य मतदार डोळयासमोर ठेऊन मदतीचे व अन्नधान्य वाटपाचे उपक्रम करीत असल्याचे शहरात दिसत असून बहुसंख्य मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांनाच चहा, नाश्ता व जेवण देण्यामध्ये अहमहमिका सुरू आहे. शहरातील १२८ नगरसेवकांपैकी ५४ नगरसेवकांच्या प्रभागात झोपडपट्टी आहेच आहे अशी स्थिती आहे.
मात्र जंतूनाशक फवारणी, आरोग्यविषयक उपक्रम , रक्तदान शिबिर अशा जगण्यातून वाचल्यानंतरच्या उपक्रमांत लोकप्रतिनिधींनी भर दिलाय.भूकेपासून वंचित कोणी राहू नये यासाठी पाच रूपयात शिवभोजन थाळी केली असली तरी इनमीन चार ठिकाणी ( प्राधिकरण, वायसीएम , वल्लभनगर एसटी,पालिका भवन) असलेल्या या थाळीसाठी कुटुंबाला घेऊन जायचे कसे? हा पण यक्षप्रश्न गरिबांपुढे निर्माण झाला आहे.अशा वातावरणातही फुगेवाडीत एक दिलासा देणारी घटना घडली.जगणं हातावर असलेल्या पारधी समाजातील लोकांनी ३७० रूपये गोळा करून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले.