मोदी पर्व २ च्या सोमवारपासून सुरू झालेल्या संसद अधिवेशनात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे मागील पाच दिवसात देशातील बहुतांश खासदारांचे व संसद भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आकर्षण बिंदू ठरले आहेत. ‘शरद पवारजी के पोते को इन्होंने गिराया’ असं म्हणत आश्चर्यचकीत करणाऱ्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जात असल्याच्या ‘बातमी खास’च्या निरीक्षणाला खासदार बारणे यांनीही आज दुजोरा दिला.
दिल्लीकरांच्या नजरेत व एकूणच संपूर्ण भारतात महाराष्ट्र म्हटलं की शरद पवार हे नाव घट्ट चिकटले आहे. राजकीय क्षेत्रात पवार म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे पवार इतकी एकरुपता मागील पाच दशकांपासून रुजली आहे. पवार घराण्याला असलेले वलय, दरारा, ताकद व जादू यांचे किस्से, कहाण्या सार्वजनिक जीवनात इतक्या भिनल्या आहेत की, राजकीय वर्तुळातही पवार कुटुंबांशी निगडीत १२ पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात जेव्हा शरद पवार यांचे नातू पार्थ अजित पवार यांनी रिंगणात उडी घेतली तेव्हा केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाचे लक्ष या लढतीकडे वेधले गेले. स्वतः शरद पवार व त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्याने राजकीय निवडणुकीत न पाहिलेले अपयश हा इतिहास असल्याने, ‘आता काय होणार?’ याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. अखेर तूफानी मोदी लाटेच्या प्रवाहात पार्थ पवार यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. मात्र शून्य राजकीय अनुभव असलेल्या या तिशीच्या आतील पार्थ पवार यांनी आपले वडील अजित पवार व आजोबा शरद पवार यांच्या वलय व ताकदीच्या जोरावर ५ लाख मते घेतली ही बाबदेखील लक्ष वेधणारी ठरली.
दुसरा अन्य कोणी उमेदवार असता तर त्याचा पालापाचोळाच झाला असता, ही काळ्या दगडावरची रेघ होती. पार्थ पवारांचा झालेला पराभव राष्ट्रवादीला व एकूणच पवार घराण्याला कोमात नेणारा ठरला. विजयी उमेदवार बारणे यांची राजकीय ताकद व उंची यामुळे रातोरात वाढली. बारणे यांनी लिंबू-टिंबूला हरवले, नाही तर पवार घराण्याला पराभवाची चव चाखायला लावली असं बोलले जाऊ लागले.
विजयाची माळ गळ्यात घातल्यानंतर जेव्हा श्रीरंग आप्पा बारणे हे मातोश्रीवर गेले व नंतर तेथून मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले तेव्हा विजयी खासदाराकडे पाहण्याची वेगळीच क्रेझ बारणे यांनी अनुभवली होती. आज या संदर्भात बातमी खासच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता बारणे म्हणाले, ‘एका कौतुकमिश्रित वेगळेपणाने जरूर पाहिलं जातंय, हे खरं आहे. मला ओळखणारे राज्यातील मराठी खासदार तसेच देशातील शेकडो अमराठी खासदार, बहुसंख्य केंद्रीय मंत्री मला ‘आप्पा’ नावानेच ओळखतात व पुकारतात. संसदभवनात तसेच लॉबीमध्ये, लायब्ररी, कँटीन, सेंट्रल हॉल, विविध मंत्र्यांची कार्यालये याठिकाणी जाताना-येताना सर्वांची माझ्याकडे पाहणारी नजर बरंच काही सांगून जाते व हा अनुभव सुखावणारा असल्याचे त्यांनी म्हटले.
वास्तविक आप्पा बारणे यांनी यापूर्वीही २००० साली पवारांचा पराभव केल्याचा इतिहास आहे. पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची मजबूत सत्ता असताना तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या आप्पा बारणे यांनी स्थायी समितीवर अध्यक्ष म्हणून विजयी पताका फडकावली होती.