उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभेच्या प्रचाराची सांगता आज सायंकाळी होत आहे. ‘आ देखें जरा किसमे कितना है दम’ या गाण्याच्या शब्दांचा प्रत्यय आता थेट मतदानातून मावळचे हे दोन्ही उमेदवार एकमेकांना ‘दम’ दाखवून ताकद अजमावणार आहेत. जबरदस्त ‘टशन’ असलेले हे गाणे ३८ वर्षे झाले तरी आजही प्रतिस्पर्ध्यांची ‘रग’ जिरविण्यासाठी जाणीवपूर्वक वाजविले जाते.
मावळची ही लढत पार्थ अजित पवार या नावामुळे आव्हानात्मक टप्प्यात आली हे वास्तव आहे. २००९ ला स्थानिक बलाढय नेता म्हणून आझमभाई पानसरे नंतर २०१४ ला ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी धोबीपछाड डाव टाकल्याने राहुल नार्वेकर यांना मावळमधून राष्ट्रवादीने मैदानात धाडले. दोन्ही वेळेस राष्ट्रवादीच्या सुभेदार व नेत्यांमध्ये असलेले मतभेद, वैर व द्वेषभावनेमुळे राष्ट्रवादीला पराभूत व्हावे लागले व शिवसेनेच्या पदरात मावळचा हा गड दहा वर्ष गेला.
यंदा कुठलीही रिस्क नको म्हणून राष्ट्रवादीने मागील दोन वर्षापासूनच मावळमध्ये तयारीला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. जिल्ह्यातील मावळ व शिरूरमधून होणारा सततचा पराभव, पिंपरी चिंचवडमधील तीनही विधानसभेत उडालेली दांडी त्यात भर म्हणजे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकाही हातातून निसटल्याने राष्ट्रवादी जमिनीवर आली. आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांना ‘कामाला लागा’ असा संदेश देऊन चाचपणीस सुरूवात करण्यात आली. १३ ऑक्टोबर २०१८ ला मावळचा प्राण असलेला भाग म्हणजे पिंपरी चिंचवड मधून पार्थ पवार यांना जाहीर कार्यक्रमातून लॉन्च केले गेले. एकाचवेळी गटबाजी, उमेदवारीवरून होणारा संघर्ष याला ‘पॅच’ बसला. गेल्या पंधरा वीस वर्षात इतक्या ‘कॅज्युअल’ स्वरूपात अजित पवार कधी शहराला दिसले नाही इतके ते दिसू लागले. पवार हे मातब्बर घराण्याचे असलेले नाव व पक्षप्रमुखांचा थेट नातूच रिंगणात असल्याचे कौतूक व उत्सुकता यामुळे पार्थ पवार हे नाव रूजायला फारसा वेळ लागला नाही. गटतटाचे धडाधड मनोमिलन, हा अजित पवारांनी यंदा अजेंडाच बनविला. आणि ग्रामपंचायतीचाही अनुभव नसलेल्या पार्थला लोकसभेला उतरवून जबरदस्त आता धाडस दाखविले आहे.
शिवसेनेचा घाम राष्ट्रवादीने काढण्याऐवजी मागील दोन महिन्यात भाजपनेच जास्त काढला. जागा बदला, बारणे नको, दुसरा कोणीही चालेल, भाजप काम करणार नाही आदींमुळे बारणेंना खिंडीत पकडण्याचे काम भाजपने चोख बजावले. परंतू बारणेंचे मागील पाच वर्षातील कार्य, संसदीय कामगिरी तसेच वेळप्रसंगी लक्ष्मण जगताप यांच्या विषयी केलेल्या आरोपांबद्दल जाहीर माफी मागून त्यांनी एकाचवेळी संघर्ष व मुत्सद्दीगिरीचे दर्शन घडवून रणांगणावर आपला जोर टिकवून ठेवला. शिवसेना-भाजपची एकत्रित ताकद, संघयंत्रणेची साथ, पाच विद्यमान आमदारांचे सशक्त खांदे, ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत सेना-भाजपची मावळात असलेली सत्ता आणि बलाढय राष्ट्राकडे जेवढी युद्धसामुग्री पाहिजे तेवढा दारूगोळा निश्चितच बारणेंकडे आजमितीस आहे. आता सारा खेळ जर-तर, तापलेला पारा, मोदी लाट आहे-नाही, एकमेकांची मनी-मसल-मॅनपावर, एकमेकांच्या मित्रपक्षांचे खरे-खोटे सहकार्य, कार्य की प्रभाव, यावर अवलंबून आहे.
आज जे काही भाजप-सेनेचे सैन्य व सुभेदार आहेत त्यांना एकेकाळी पवारांच्या मांडवाखालूनच रस्ता पार करावा लागल्याचा इतिहास आहे. त्यामुळे बारणेंच्या विकासकामाला आव्हान संवादाचे व संबंधाचे असा निराळाच प्रचाराचा सूर निर्माण झाला आहे. कोरी पाटी की अनुभव श्रेष्ठ ठरणार? हे आता मतदानातूनच निश्चित होणार असले तरी दोघांचीही वाट नक्कीच सोपी नाही.