लोकसभेसाठी राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या शिरूर व मावळ या मतदारसंघासाठी घुगऱ्या, पाकीट आणि पॅकेजचे वाटप सुरू झाल्याने मुख्य लढत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही या वर्षावात न्हाऊन निघण्यासाठी कंबर कसली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिरूर व मावळ या दोन मुख्य लढतींकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष् लागले आहे. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार तर शिरूरमधून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे. मनी, मसल आणि मॅनपावर मध्ये कोण कोणाला भारी ठरतोय? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचार पत्रकांची छपाई, रॅलीसाठीच्या गाडया, रथ, सभांचा खर्च या दिसणाऱ्या खर्चामध्ये अजिबात हात आखाडता घेतलेला नाही. चारही पक्षातील तळातील यंत्रणा म्हणजे शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख, तर भाजपमधील विविध आघाडयांचे अध्यक्ष, मंडलप्रमुख, बुथचालक, शक्तीकेंद्रचालक, तर काँग्रेस व राष्ट्रवादीमधील विदयार्थी, युवक, महिला या आघाडयांचे अध्यक्ष यांच्यापर्यंत घुगऱ्यांचे वाटप झाले आहे.
चारही पक्षातील ‘क्रिम’ भाग म्हणजे ताकदवान कार्यकर्ते, नगरसेवक, माजी नगरसेवक यांना पाकीटे देण्यासाठी यादया बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरअध्यक्ष, माजी आमदार, आमदार, खासदार यांची पाकीटे शेवटच्या ४८ तासात येतात ही वस्तुस्थिती आहे. लोकशहीच्या चौथ्या स्तंभाची धुरा सांभाळणाऱ्या मिडियानेही अलिकडील दहा वर्षात पॅकेज संस्कृतीला जन्म देऊन उमेदवारांना खड्डयात लोटण्याचे व वेळप्रसंगी खड्डयातून बाहेर काढण्याच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत.
लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या या निवडणूकांद्वारे सामान्य मतदारांपर्यंत मात्र घुगऱ्या पोहोचत नसल्या तरी सोसायटया, अपार्टमेंट, गृहसंकुले यांनी आपल्या अंतर्गत सामूहिक योजनांच्या स्वप्नांचे आडाखे उमेदवारापर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे दिसून येत आहे.