सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जिकडे तिकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे दादा चौकार मारणार की कोल्हे बाजी जिंकणार? कोल्हे समर्थक आढळरावांच्या गेल्या पंधरा वर्षातील कामाचा नन्नाचा पाढा वाचत असताना मात्र आढळराव समर्थक कोल्हेंची जात काढण्यापासून संभाजी मालिका ते फ्लॅट विक्री आदी वैयक्तिक मुद्दयांपर्यंत पोहोचले असल्याने आढळरावांचा त्रिफळा उडतो की ते चौकार मारतात हे पाहणे रंजक ठरणारे आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मागील पंधरा वर्षापासून खासदार आहे. २००४, २००९ आणि २०१४ असा सलग तीनदा विजय मिळवित त्यांनी शरद पवारांना ही जागा जिंकण्यासाठी हरतऱ्हेने प्रयन्त करूनही सतत अपयश पहायला लावले आहे. मध्यंतरी शदर पवारांनी स्वत: येथून लढण्याची चाचपणी केली तर अलिकडे डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उद्विग्न होऊन अजित पवारांनी येथून लढण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले होते.
वास्तविक शिरूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेला हा ग्रामीण व शहरी अशी संमिश्र जोड या मतदारसंघाला मिळाली आहे. अशोक मोहोळ, विलास लांडे, देवदत्त निकम असे तीन वेगवेगळे चेहरे राष्ट्रवादीने येथे देऊन पाहिले मात्र सर्वांचा खुर्दा पडल्याने ‘आढळराव ही पुणे जिल्ह्यात फार मोठी ताकद असल्याचा साक्षात्कार स्वत: त्यांना व शिवसेनेलाही झाला. आढळरावांचे दूर्देव म्हणजे २००४ आणि २००९ या दोन टर्ममध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात असल्याने ते खासदार असूनही काठावरच राहिले. त्यांच्या योजना, त्यांच्या कल्पना यांना मूठमाती लावण्याचे व त्यांना मोठे होऊ न देण्याची चाल राष्ट्रवादीने अर्थातच शरद पवारांनी खेळली. आणि जेव्हा तिसऱ्यांदा २०१४ ला आढळराव पुन्हा खासदार झाले तेव्हा मोदींनी तर चिमटीत उंदीर पकडावा व बाहेर फेकून दयावा अशी अवस्था सेनेची केली होती. त्यामुळे आढळराव हे सत्ताधारी असूनही विकास प्रक्रिया राबविण्यापासून वंचितच राहिले. एसईझेड चा मुद्दा, आंतराराष्ट्रीय विमानतळ, पुणे नाशिक महामार्ग तसेच रेल्वे, मतदारसंघातील आदिवासींचा विकास, स्थानिक भूमीपूत्रांना रोजगाराच्या संधी देण्यातील अपयश आदी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर आढळरावांना विरोधकांनी घेरले. मात्र लोकांच्या सुख दु:खात भाग घेण्यापासून प्रचंड जनसंपर्क, कोणाला अंगावर न घेण्याची वृत्ती या बलस्थानामुळे आढळराव यांची छाप हृदयात कोरली गेली व हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे सिद्ध झाले आहे.
चाणाक्ष राजकारणी असलेल्या शरद पवारांनी आढळरावांचा अश्वमेध रोखण्यासाठी, जातीचे कार्ड खेळण्याचा मास्टर प्लॅन केला. आणि जातीबरोबरच उच्चशिक्षित, ग्लॅमर चेहरा असा त्रिवेणी शॉट डॉ. अमोल कोल्हेंच्या रूपाने पवारांना गवसला.
आज शिरूर लोकसभेमध्ये ओबीसी मतदारांची संख्या पावनेचार लाखाच्या आसपास आहे. त्यामध्ये माळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. स्वातंत्र्यानंतरच्या जेवढया निवडणूका झाल्या त्यामध्ये पुर्ण जिल्ह्यातून ओबीसी अर्थात माळी समाजाला संधी मिळालेली नाही हे वास्तव आहे. हिच बाब हेरून वेगळा प्रयोग खेळण्याचा निर्णय पवारांनी घेतला आणि आता तो सक्सेस होताना दिसत आहे. संभाजी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले डॉ. कोल्हे यांचे नाव, त्यांचे उच्चशिक्षित असणे, वाणी आणि संभाषणात त्यांचा निर्माण झालेला दबदबा आज विरोधकांनाही अस्वस्थ करत असल्याचे चित्र आहे.
डॉ. कोल्हे यांना संभाजी ब्रिगेडने समर्थन देणे तसेच खेड बाजार समितीने त्यांचे नाव उचलणे या घटना ‘बदल सर्वांनाच हवाय’ हे सूचित करणाऱ्या सिद्ध होत आहेत. आज अनुभव, पैसा, सत्ता आणि मुत्सद्दीपणा ही आढळरावांची बलस्थाने आहेत. कोणाचा उपयोग कसा करायचा यामध्ये ते डॉक्टर नसूनही ‘सर्जन’ समजले जातात. मात्र सलग पंधरा वर्ष तोच तो चेहरा, मुलभूत प्रश्नांची तड न लागल्याची जाणवणारी पोकळी, बैलगाडा, विमानतळ प्रकरणी दिसून आलेली दुटप्पी भूमिका, समतूल्य कार्यकर्त्यांना ताकद देण्यात व मोठे करण्यात आलेले अपयश या त्यांच्या दुखऱ्या नसा आहेत.
तर डॉ. कोल्हे हे जात, शिक्षण, वर्क्तृत्व, नेतृत्व व आत्मविश्वास या राजकीय यश मोजल्या जाणाऱ्या पहिल्या पाच मार्कातच पैकीच्या पैकी पास झाले आहेत. आढळरावांना जसे खासदार म्हणून घर ना घर ओळखते तसे अभिनेता म्हणून कोल्हेंना घर ना घर ओळखते. त्यांना पाहून, ऐकून, अनुभवून एक अनामिक उर्जा तरूणांना मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. कर्तबगार संभाजीप्रमाणे हा समोर दिसणारा तडफदार संभाजी अर्थात अमोल कोल्हे काही तरी करू शकतो अशी खात्री येथील जनतेला पटू लागली आहे. त्यामुळे आढळरावांचा त्रिफळा उडतोय की ते पुन्हा चौकार मारतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.