मावळच्या जागेचे आता कसं होणार? बोगद्यात कोंडी व्हावी आणि पळायला व ओरडायलाही चान्स नसावा, अशी अवस्था भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेची करून टाकली होती. जगतापांनी युतीधर्म निभावला नाही तर काय होईल? या एकाच प्रश्नाने गेली काही दिवस पिंपरी-चिंचवड शहराचं राजकारण तापलं होतं आणि अखेर ‘लक्ष्मण जगताप यांनी या मिलनासाठी होकार दिला आणि भाजप व शिवसेनेचा जीव भांड्यात पडला.
एक लक्षात घ्यावे लागेल की, अत्यंत जड अंतकरणाने श्रीरंग बारणे यांनी जरी दोन पावले मागे जात जगतापांवर आणि भाजपवर केलेले आरोप मागे घेतले असले तरी तेवढ्याच जड अंतकरणाने जगताप यांनी त्यांना माफ केले आहे. यामध्ये कोणी-कोणावर मात केली असा जर निष्कर्ष काढायचा झाला तर बारणेंपेक्षा चार पाऊले जगतापांनी मागे घेतली असे दिसून येते. जगताप यांची प्रतिमा, रुबाब, दरारा व कोणापुढे न झुकणारा स्वभाव पाहता आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला साक्ष ठेऊन बारणेंना त्यांनी माफ करून एका दगडात अनेक पक्षी तर मारलेच, शिवाय बारणेंपायी आपला पक्ष, नेते, कार्यकर्ते नगरसेवक आणि स्वतःवर जे संकट ओढवू शकते यापासून सुटका करून घेतली.
या दोघांमध्ये असलेली राजकीय दुष्मनी जर जगताप हे भाजमध्ये नसते तर उभ्या जन्मात कधी मिटली नसती. भारत आणि पाकिस्तान जसे एकमेकांचे मित्र होऊ शकत नाही, अगदी तसाच हा प्रकार होता. अत्यंत प्रतिकूल अवस्थेत असलेल्या या शहराला जगताप यांनी भाजपचा चेहरा मिळवून दिला. पवार घराण्याचे नामोनिशान या शहरातून त्यांनी मिटविले खरे मात्र आपल्याच पक्षाचा दुसरा सख्खा मित्र मधल्या वादानंतर पुन्हा एकत्र आल्याने जगतापांची कोंडी झाली. भाजप-शिवसेनेच्या फाटलेल्या साडेचार वर्षाच्या संबंधात खरं तर खासदारकी लढविण्यासाठी जगतापांना भाजपने अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी बळ दिलं. युती होणे अशक्यच असल्याच्या वातावरणात मावळ व शिरूरमधून जगताप व लांडगेंना तयार करून मोहिमेवर धाडण्याच्या मागे खरं तर भाजपच होता. परंतु भाजपला देशपातळीवर लागलेली उतरती कळा, महत्त्वाची राज्ये हातातून निसटणे, संपलेली काँग्रेस बलाढ्य होणे या गोष्टी बघून भाजपने मान टाकली आणि शिवसेनेशी पुन्हा ‘याराना’ केला. शिवसेनाही हात मिळवायला आतूर होतीच; परंतु नतमस्तक झालेला भाजप बघून सेनेच्याही दंडातील बेंडकुळ्या फुगल्या. शिवसेनेच्या या दोन्ही खासदारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निगडीत घेतलेला कार्यक्रम असो की लांडगेंना लढण्यासाठी दिलेली चाल असो, भाजपने मात्र नंतर युती करून जगताप व लांडगे यांना सर्वप्रथम तोंडावर पाडले.
लांडगेंनी मात्र आपली तलवार लगेचच म्यान केली मात्र जगतापांच्या स्वभावात हे नसल्याने, ‘मावळ भाजपला सोडावा, बारणे पडले तर भाजप जबाबदार नाही, उमेदवार बदला,’ असे अनेक प्रयोग त्यांनी करून पाहिले. आता बारणेंच्या दुष्मनीपायी आपले राजकीय आयुष्य जगताप पणाला लावतात की काय? अशी स्थिती झाली. बारणेंनी घरी जाऊन जगतापांची भेट घेणे, नीलम गोऱ्हे, संजय राऊत, मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करणे आदी होऊनही जगताप बधत नाहीत, असे पक्षाच्या लक्षात येऊ लागले होते, तर इकडे बारणेंनी लोकांच्या नजरेत सहानुभूती मिळविली होती, फेसबूकवर माफी मागितली होती, भाजपच्या कार्यालयात जाऊन आले होते, जगताप आता ऐकणारच नाही हे बघून संघ व भाजपने अखेर आपली प्रचार यंत्रणा सुरू केली होती, जगतापांशिवाय भाजप-सेना एकत्र येण्याच्या हालचाली वेग घेऊ लागल्या होत्या. आणि नेमकं हेच वातावरण धोकादायक ठरू शकतं? असा अंदाज जगतापांना आला असावा. सत्ता असूनही पक्षाने त्यांना मंत्रीपद न देणे, प्राधिकरणावर त्यांची वर्णी न लागणे, तर अलिकडे विलास मडेगिरी यांना स्थायी समिती अध्यक्ष बनवून पक्षाने आपली वक्रदृष्टी दाखवायला सुरुवात केली होती.
बारणेंचे काम नाही केले तर चार महिन्यांवर येणारी विधानसभा निवडणूक, पुढे मंत्री होण्याची दाट शक्यता या सकारात्मक बाबींवर पाणी पडू शकणार होतं, शिवाय बारणेंसाठी पक्ष सोडला तर किती पक्ष हा माणूस बदलतो? या गोष्टी प्रतिमा अजून डागाळणार होत्या.
अखेर बारणेंकडून जाहीर माफीनामा वदवून घेतला तर आणि मगच मनोमिलनास होकार दिला, तर जास्त चांगले असा त्यांच्या मनाने कौल दिला असावा आणि हे मनोमिलन झाले असावे.
मनोमिलन झाले नसते तर बारणेंचे कमी पण जगतापांचे जास्त नुकसान झाले असते. परंतू या निमित्ताने का होईना आपली ताकद, आपले महत्त्व दाखविण्यास व राज्यपातळीवरील नेत्यांनाही आपल्यापुढे नाचवण्यात जगताप शंभर टक्के यशस्वी झाले, असे म्हणता येईल.
बारणेंना मिठी मारून त्यांनी कर्णाचा दानशूरपणा अवलंबला तर सिंकदराचा जग जिंकल्यानंतर एका साधूमुळे नष्ट होणार अहंकारपणा जगताप यांनी करुणा दाखवून संपविला. अभिमन्यूसारखे आपण चक्रव्ह्यूवात घेरले जाण्याची शक्यता ओळखून जगताप यांनी आपल्या निश्चल, दूरगामी व भविष्यवेधी उड्डाणाची साक्ष दाखवून दिली आहे. बारणेंना विरोध कायम ठेवला असता तर पँटदेखील निट घालायची पात्रता नसलेले ‘बाजीराव’ डोक्यावर बसले असते. आता जगतापांनी उशीरा तलवार म्यान करून आपल्या एकाच खेळीने मुख्यमंत्र्यांना, संघाला, भाजपला व शहराला खूश करून मुत्सद्देगिरीमध्ये आपणच ‘बाप’ आहोत हे दाखवून देत ‘हार कर जितने वाले को बाजीगर कहते है’ हे सिद्ध केले आहे.