रायगड जिल्हा हा आमचा सशक्त बालेकिल्ला आहे. आज स्वबळावर खासदार येईल इतकी आमची ताकद नसली तरी येत्या लोकसभा निवडणूकीपासून शेकापला ताकदवर होण्याचा रस्ता आता मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार व शेकापचे नेते विवेक पाटील यांनी आज ‘बातमी खास’शी बोलताना दिली.
शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी स्थापन झालेला शेकाप या पक्षाला ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्हा ही आमची असलेली ओळख मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून पुसली गेली आहे. आता पिंपरी चिंचवड व पुणे इतपर्यंत आमचा विस्तार झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दिड दशके शिवसेनेबरोबर युती होती. त्याचा परिणाम म्हणजे २००९ मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर हे मावळचे पहिले खासदार म्हणून आम्ही निवडून आणले. कालांतराने सेनेबरोबरची युती तुटली मग २०१४ ला आमचा स्वतंत्र उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांना आम्ही उभे केले. परंतू मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची युती झाली असून पार्थ पवार यांना निवडून आणून शेकापची ताकद व अस्तित्व दाखविण्याची संधी आता आम्हाला मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज रायगड जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या, नगरपरिषद, यावर आमची सत्ता असून कार्यकर्त्यांचा असलेला पक्ष ही आम्हाला मिळालेली लोकमान्यता कुठलीही लाट येवो ती पुसली जाऊ शकत नसल्याची भावना श्री. पाटील यांनी व्यक्त केली.