विजय जगताप
कोथिंबीर खुडून काढावी तसे एका क्षणात माझे राजकीय आयुष्य उद्धवस्त झाले असून आता आपण पूर्ण ताकदीने व क्षमतेने पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी आज ‘बातमी खास’शी बोलताना व्यक्त केली.
आपले आख्खे राजकीय आयुष्य म्हणजे जवळपास ४० वर्षे पिंपरी चिंचवडमध्ये व्यतीत केलेले बाबर हे सध्या राजकीय विजनवासात आहेत. २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ते पहिले खासदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचा या शहरात पाया रोवणाऱ्या प्रमुख मंडळींमध्ये गजानन बाबर यांचा समावेश होतो. १९७७ साली नगरपालिकेचे नगरसेवक पुढे हवेलीचे दोन वेळा आमदार व एकदा मावळचे खासदार असा शिवसेनेतील त्यांचा चढता राजकीय आलेख होता. २०१४ ला मात्र विद्यमान खासदार असताना शिवसेनेने त्यांना उमेदवारी न देता श्रीरंग बारणे यांना दिली. रागापोटी त्यांनी मनसेत प्रवेशही केला. मात्र मनसेत मन न रमल्यामुळे पुढे त्यांनी शिवसेनेत येण्यासाठी मातोश्रीचे बऱ्याचदा उंबरठे झिजवले. पुन्हा शिवसेनेत येण्यासाठी नानाविध प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी सेनेचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले होते.
मध्यंतरी त्यांनी भाजपात प्रवेश केला खरा मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अखेर त्यांनी साताऱ्यातील वाई या आपल्या कर्मभूमीत शेती व सहकार क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. ‘आज साताऱ्यातील तीन साखर कारखान्यांमध्ये व्हाईस चेअरमन असून मी समाधानी आहे. ज्यांनी मला सेनेत येण्यापासून रोखले आज त्यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. आता करा खर्च? अशी मिश्कील शेरेबाजी त्यांनी आपल्या खास बाबर स्टाईलमध्ये यावेळी व्यक्त केली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज हयात असते तर माझ्यावर कदापी ही वेळ आली नसती. आता माझ्या कोणी पाया पडले तरी मी या शहरात युतीचा प्रचार करणार नाही मी भाजपचा जरूर प्रचार करेन पण तो इथे नाही तर साताऱ्यात..! बूँद से जो गयी वो हौदसे वापस आती नही’ असा शेरही श्री. बाबर यांनी यावेळी सुनावला.
मावळच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारली असता, बारामतीकर अजून किती वर्षे आमच्या शहरावर घराणेशाही लादणार? येथील भूमीपुत्रांनी व कार्यकर्त्यांनी कायम चादरीच उचलायच्या का? स्वाभिमान नसलेल्या येथील कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला.