सेना भाजपची युती होऊनही पिंपरी चिंचवडमध्ये मात्र चर्चेला सुरूवात कोणी करायची, पुढाकार कोणी व कसा घ्यायचा याविषयीची संभ्रमावस्था कायम होती. अखेर येत्या १८ मार्चला पुण्यात मनोमिलनाचा मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आमच्या एकत्रित चर्चा व गाठीभेटी सुरू होतील अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी आज बातमी खासशी बोलताना दिली.
गेली साडेचार वर्षे या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेला टोकाचा संघर्ष, वाद व कुरघोडीने तर कळस गाठला होता. उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’ असे जाहीर वक्तव्य करून या भांडणाला राष्ट्रीय पातळीवरील न्यूज बनविली होती. मात्र १९ फेब्रुवारी युती झाली आणि क्षणार्धात सारे काही गुडीगुडी झाले. राज्यात या संघर्षाची धग सेम टू सेम पिंपरी चिंचवड मध्येही कायम होती. मात्र अद्यापही मावळच्या जागेवर उमेदवार कोण? हे नाव सेनेकडून गुलदस्त्यातच असल्याने गंभीरता अजूनही कायम आहे.
आज बातमी खासशी बोलताना योगेश बाबर म्हणाले, १९ मार्च पासून भाजपच्या शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी संवादपर्वाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी १८ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात युतीचा मनोमिलनाचा कार्यक्रम होऊन जबाबदारी व व्यूहरचना ठरली जाईल. दरम्यान, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी ज्याप्रमाणे सेना-भाजप व आरपीआय मध्ये संवाद होता व प्रचाराची आखणी, दिशा व जबाबदाऱ्यांचे वाटप झाले होते तसे यंदापण होईल अशी चिन्हे आहेत. तेव्हाचे भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेनेचे शहरप्रमुख भगवान वाल्हेकर व आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी एकत्रितपणे मावळमधून श्रीरंग बारणे व शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी रणनिती आखली होती.
आता तशी वेळ आली असली तरी या दोन्ही पक्षांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा इगो, अहंकार, प्रतिमा, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्वाच्या श्रेणीमध्ये अडकायला नको अशी अपेक्षा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.