विजय जगताप
रस्ता एकच, एकाच प्रकारची दुकाने १४८, रोजगार मिळतोय ८०० जणांना आणि रोजची उलाढाल आहे २० लाख…! पिंपरीतील साईचौकातील या मोबाईल ‘मंडई’ची आहे ही खास माहिती.
पुणे जिल्हयातील सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ म्हणून पिंपरीतील साई चौक ओळखला जातो. बातमी खासच्या टिमने या चौकातील मोबाईल उद्योगाच्या खोलात शिरल्यानंतर धक्कादायक, आश्चर्यचकीत करणारी व कोडयात टाकणारी मनोरंजक माहिती उघडकीस आली.
कसा चालतो हा मोबाईल् उद्योग? कशी होते रोजची उलाढाल? मोबाईलने खरंच वेड लावलंय का माणसाला? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न बातमी खासच्या टीमने नुकताच केला.
१९९६ च्या सुमारास जगात मोबाईल अवतरला. प्रचंड आकर्षण व स्टेट सिंम्बॉल असलेले हे गॅझेट आज माहिती नाही असा पृथ्वीवर एकही माणूस नाही. दोन वर्षाच्या पोरापासून नव्वदीपर्यंतच्या माणसाला खिळवून ठेवलंय या मोबाईलने. जून २००० पर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्यात मोबाईल् नव्हता. त्याअगोदर जे कोणी मोबाईल वापरत होते त्यांची स्टाईल, त्यांचा अंदाज पाहून मोबाईल जवळ नसलेला हुरळून जाई. जुलै २००० ला रिलायन्स ने या उद्योगात उडी टाकली आणि ‘५०० रूपयात मोबाईल’ अशी घोषणा करीत दमदार एन्ट्री केली. आणि पाहता पाहता भारतातील ४० टक्के ग्राहक अक्षरशा खेचला. पिंपरी बाजारपेठ हि गेल्या ५० वर्षापासून कापड व्यवसाय, भाजी मंडई, फुलबाजार यासाठी फेमस तर होतीच, परंतू मोबाईल युग अवतरले आणि या व्यवसायात फार मोठा धंदा आहे हे चाणाक्ष असलेल्या सिंधी समाजाने ओळखले आणि मोबाईल धंदयात उडी घेतली. आज शगून चौक पासून साई चौकापर्यंत ते पुढे वैष्णोदेवी मंदीर, अशोक थिएटर रोड पर्यंत फक्त मोबाईलची १४८ दुकाने आहेत. रोज सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत धो धो वाहणारा हा मोबाईल रस्ता व तेथील शगुन आणि साई हे दोन चौक रात्री ग्लोसाईन बोर्ड व डिजीटल व्हिडीओ स्क्रीनच्या झगमगाटामुळे दुबई किंवा सिंगापूरमध्ये आल्याचा भास निर्माण करतात.
विवो, ओप्पो, या चीनी कंपन्यांनी तर जाहिरात कशी असते हे मोबाईल इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे. बाकी इतर कंपन्याही जाहिरात करतात परंतू भपकेबाज पणा यामध्ये विवो, ओप्पोने बाजी मारली आहे. केडी, एस.के, आसवानी, फवनानी या चौघांचे या रस्त्यांवर साम्राज्य आहे. मोबाईल कंपन्या विक्रेत्यांना पीस मागे समजा दोनशे रूपये कमी आकारत असल्या तरी हे विक्रेते पंचवीस रूपये एका पीसमागे मिळाले तरी चालतील परंतू गिऱ्हाईक सोडत नाही. गरीब, मध्यमवर्गीय साध्या दुकानात जातो तर स्वत:ला गरीब न समजणारा पॉश दुकानांमध्ये मोबाईल घेणे पसंद करतो. मोबाईल कंपन्या विक्रेत्यांना सवलतीत फक्त पीस विकत नाहीत तर या महिन्यात १०० मोबाईल विकले तर इतका इतका भरघोष डिस्काऊंट देऊ अशा ऑफर देतात. ज्या कंपनीची ऑफर चांगली तेच पीस विक्रीला काढण्याचा या विक्रेत्यांचा फंडा असतो. बहुतेकदा तुम्ही सॅमसंग घ्यायला जाता आणि विवो घेऊन येता असेही घडते. या सर्व दुकानांमध्ये कामाला असलेल्या पोरांना पगार फार कमी असतो. परंतू त्यांनी हेडफोन, चार्जर, ब्लुटुथ, मेमरीकार्ड, स्क्रीनगार्ड, कव्हर, आदी गोष्टी विकल्या तर मालक त्यांना भरपूर कमिशन देतो. थोडक्यात वीस रूपयाचा कव्हर दुकानातील पोराने शंभरला त्याच्या स्कीलने विकला तर मालकाला वीसच दयायचे वरती ८० रूपये पोराच्या खिशात जातात. अशा रितीने दररोज एक हजार ते दिड हजार रूपये कमविणारी पोरं पण इथे आहेत. मोबाईल् दुरूस्ती हा पण या बाजारपेठेतला महत्त्वाचा पार्ट आहे. ९९ टक्के ग्राहक हा मोबाईल नीट चालेनासा झाला की गडबडून जातो. दुरूस्तीला टाकलेले परंतू मोबाईल परत घेऊन न गेलेले मोबाईल मोजले तर छोटा हत्ती टेम्पो फुल्ल भरून जाईल इतके मोबाईल या बाजारपेठेत साचल्याचे चित्र आहे.
प्रत्येक गोष्टीची एक क्रेझ असते, काळ असतो परंतू मोबाईलची क्रेझ काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. पूर्वी घरात एकच टेलिफोन असायचा आख्ख्या खानदानाला घरात फोन असल्याचा अभिमान वाटायचा. आता घरटी चार-चार मोबाईल आहेत. मोबाईलची जादू व आकर्षण यामुळे साईचौक फुलतच चालला आहे. सणा सुदीला तर या बाजारपेठीला सुगीचे दिवस येतात.
अशी आहे या पिंपरीतील मोबाईल इंडस्ट्रीची खबर. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.