( विजय जगताप)
राजकारण ही नशा आहे का? तर ते एक हजार टक्के सत्य आहे.जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपलं नेतृत्व अबाधित रहावं, असं यामध्ये असलेल्यांना वाटतं का? तर ते देखील सत्य, सत्य आणि सत्यच आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मधील ३० हून अधिक आमदार सोबत घेऊन अजितदादा यांनी भाजप सोबत सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवाय “राष्ट्रवादी आमचीच” असा कायदेशीर डाव टाकल्याने महाराष्ट्रातील सत्ता नाट्य संपूर्ण देशात चर्चेत आले आहे.
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राने एक नवा ट्रेंड सेट केला आहे, आणि तो म्हणजे थेट पक्षावरच कब्जा करणं. राजकारणात पूर्वी एकमेकांमध्ये पटत नसलं की पक्ष सोडायचा, बंड करायचं, नवीन पक्ष काढायचा असे प्रकार चालायचे. आता महाराष्ट्राने देशातील तमाम राजकीय पक्षांना एक नवा प्रोग्राम दाखवून दिला आहे तो म्हणजे थेट पक्षावरच ताबा आणून तो गिळंकृत करून टाकणं …!
अजितदादा यांचा फटकळ व रोखठोक स्वभाव १९९२ पासून महाराष्ट्र अनुभवत आहे. केवळ आणि केवळ ते शरद पवारांचे पुतणे असणं व त्यांना विरोध करणं म्हणजे साक्षात पवार साहेबांना विरोध करणं होय, या धारणेमुळेच अजितदादांचं पक्ष संघटनेत असो की राज्यकारभारात कायम वर्चस्व राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत अर्धा डझन प्रदेशाध्यक्ष झाले असतील परंतु अजित दादांना डावलून त्यांची नाराजी पत्करून एकानेही वेगळा निर्णय घेण्याचं धाडस आजपर्यंत दाखविलेलं नाही. प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या अजित दादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपून राहिलेली नाही.
काकांचे राजकारण, त्यांच्या खेळया,चाली व चितपट करणारे डाव बघतच अजितदादा तयार झाले खरं, पण परंतू वयाची चौसष्टी गाठली तरी सर्वोच्च पद लाभत नाही ही अस्वस्थता अलीकडे त्यांना प्रचंड सतावत होती. यापूर्वी अनेकदा शरद पवारांनी घेतलेले निर्णय फिरवण्याचे साहस आपल्या स्वभाव शैलीनुसार अजितदादांनी केलं. त्यामध्ये एखाद्याला जाहीर झालेले तिकीट बदलणं असो की पद असो.. परंतु या गोष्टी कायम चार भिंतीच्या आत राहिल्या. शरद पवारांना खुलेआम थेट आव्हान अजितदादांनी देण्याचं काम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केल्याचं प्रकर्षाने दिसून आलं. राष्ट्रीय राजकारणात पिछेहाट झाल्यानं आपल्या स्वतःची पक्ष संघटना देखील आपल्या हातात आता राहिली नसल्याची जाणीव या काळात शरद पवारांना ठसू लागली. “अजित पवार करे सो कायदा” अशी स्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाल्याचं त्यावेळी त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं. अशातच ‘यापुढे आता लोकसभा निवडणूक लढणार नाही’ असे त्यांनी घोषित करत राज्यसभेतून संसदेत जाण्याचा निर्णय घेतला.याच दरम्यान, पार्थ पवार यांना मावळ मधून खासदारकीसाठी लॉन्च करण्याच्या विचारात अजितदादा होते. एकीकडे सुप्रिया, दुसरीकडे मी आणि आता परत तिसरा पवार घराण्यातील पार्थ रिंगणात उतरणं म्हणजे राज्यातील जनतेमध्ये चुकीचा मेसेज जाईल, असं शरद पवारांना वाटत होतं. थोडक्यात पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांनी आडवळणांनी विरोधच केला होता. परंतु राजकारणाचा व समाजकारणाचा शून्य अनुभव असलेल्या पार्थ पवारांची उमेदवारी अजितदादांनी कायम ठेवली. शरद पवारांना हे पसंत पडलं नाही आणि व्हायचं तेच झालं…. अजितदादांनी आकाश पातळ एक करून देखील त्यांना आपल्या पुत्राचा पराभव पहावा लागला. पुढे लगेचच सहा महिन्यांनी आलेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत तिकीट वाटपाची सर्व सूत्रे व प्रचार यंत्रणा शरद पवारांनी आपल्या हातात घेतली. आणि आता मात्र हळूहळू या कुटुंबात ठिणग्या पडू लागायला सुरुवात झाली. १३ ऑगस्ट २०१९ या दिवशी बारामतीत सगळे कुटुंब एकत्र असताना तूफान खडाजंगी एकमेकांमध्ये उडाली.परंतू हा वाद स्फोटक वळणावर गेला नाही. नंतर पार्थ पवार यांची “जय श्रीराम” अशी सोशल मीडियावर पोस्ट पडली… कुटूंबाची गाडी चूकीच्या वळणांवर आल्याचं दिसून येत होतं. तोच महाविकास आघाडीचा जन्म झाल्याने व अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानं अडीच वर्षे वातावरण शांत झालं होतं. नंतर शिवसेना फुटली आणि अजितदादा विरोधी पक्षनेते झाले. सत्ता असो की नसो, मोठे पद आलं की ते हमखास अजितदादांसाठी सोडायचं असतं असा प्रघात एव्हाना पक्षात रूढ झाला होता. पुढे पुढे अजित पवारांचं रुसून बसणं, फोन बंद करणं, सुट्टी घेणं, अचानक चालू दौऱ्यातून गायब होणं…या सा-या गोष्टी काही तरी वेगळं घडतंय.. अशा शंका निर्माण करणार्या होत्या. अजितदादा विरोधी पक्षनेते होते तरी सत्ताधाऱ्यांवर त्यांचा हल्ला वर्षभर मिळमिळीतच असल्याची खंत पक्षामध्ये कुजबूज निर्माण करत होती. धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या राज्य शासनाच्या कार्यक्रमात उन्हात भाजून लोकं तडफडून मेली तरी औपचारिकता म्हणून संताप व्यक्त करण्या पलीकडे अजित दादांनी फारसं हे प्रकरण ताणलं नाही.
अजितदादा आता योग्य संधी व वेळ शोधत होते. तर ‘अजित कधीही दगा फटका करू शकतो’ ,असा अंदाज आल्यानेच मध्यंतरी शरद पवारांनी राजीनामा अस्त्र उगारून आपल्या ताकदीची खात्री करून घेतली होती. शिवाय भाकरी फिरवत सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलं होतं. आपण राजकीय वारसदार नसणार याची अजित पवारांना तशी एक वर्षापासून कल्पना आली होतीच. त्यांना आता आख्खा पक्षच ताब्यात घ्यायचा होता, त्यानुसार भाजप मधल्या अदृश्य शक्ती त्यांच्यासाठी काम करत होत्या.आणि ठरल्याप्रमाणे मागील आठवड्यात अचानकपणे शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सामील होत नऊ जणांसह अजितदादांनी मंत्रिमंडळात प्रवेश केला. हे करत असताना निवडणूक आयोगाकडे दोन तृतीयांश आमदारांच्या सह्या व पाठिंबा असलेली कागदपत्रे सादर करत कायदेशीर औपचारिकता ते अगोदरच करून बसले होते. पुढे ४८ तासातच “वय झालं, आता थांबा..” असा जाहीर सल्ला अजित पवारांनी आपला काकांना देत आजवरच्या त्यांच्या राजकारणाचे व गुप्त भाजप- सलगीचे वाभाडे जगजाहीर काढले. इकडे भाजपला तर इतका मोठा मासा आपल्या गळाला लागलाय, याचा प्रचंड आनंद झाला होता, परंतू ते दाखवून देत नव्हते. शरद पवारांच्या दगाबाजीच्या राजकारणावर हल्ला करण्या पर्यंत छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल यांची मजल गेली.
शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकांच्या पाठीत जरूर खंजीर खूपसले असतील, पाताळयंत्री डाव देखील आखले असतील, परंतु हे सारं ते स्वतःसाठी करत होते,स्वतःचं महत्त्व वाढविण्यासाठी करत गेले होते.आपला अंदाजच समोरच्याला न येऊ देणं..हा अविश्वासू चेहरा ते जरूर बनले होते.या उलट अजित पवार आज जे काही वागत-बोलत आहेत व कॄती करीत आहे ते दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी व त्यांची मर्जी रहावी म्हणून करत आहेत. दोघांमधला हा मुख्य फरक आहे. राहता राहिली गोष्ट छगन भुजबळांची..भायखळयात भाजी विकणारे भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खुप मोठे झाले. त्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचे साहस दाखविले ते आज शरद पवारांवर डाफरत आहे. आपली सोय आणि कातडी वाचविण्यासाठी आता निष्ठा,दैवत हे शब्द राजकारणात फिके पडत चालले आहेत.महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, खंबीर व स्थिर शासन देण्यासाठी सत्तेत आलो.. असे आज जे काही अजित पवार व मंडळी मुद्दे मांडत आहेत ते शेंबड्या पोराला देखील पटत नसल्याचे चित्र आहे.
प्रचंड गुणवत्ता व गतिमान राज्यकारभार करण्याची अजित पवार यांची क्षमता आहे का तर जरूर आहे, शरद पवारांनी त्यांची आजवर कोंडी केली का ? तर ते देखील शंभर टक्के सत्य आहे. काका पुतण्यातील हा संघर्ष आता पुढे नक्कीच पेटत जाणार आहे ,परंतु एकमेकांवर शिवराळ भाषा, एकेरी भाषा, दोन गटांमध्ये हाणामारी असे प्रकार बिल्कुल यांच्यात होणार नाही,असं सध्या तरी दिसतंय.
साडेतीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना पहाटे शपथविधी घ्यायला लावून तोंडावर ज्या प्रकारे नंतर पाडले गेलं तसंच भाजपशी सलगी दाखवून राष्ट्रवादीला भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करून घ्यायचं व नंतर साक्षात मोदींना हात चोळायला लावायचं.. असाही या काका पुतण्याचा डाव असू शकतो. किंवा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपाच्या साथीने पूर्ण करून टाकू..अशीही स्क्रिप्ट लिहिली गेलेली असू शकते.या सा-या शक्यता व जर तर चा भाग आहे. शेवटी राजकारणात कधीही, काहीही घडू शकतं…! परंतू एक मात्र खरं की, शरद पवारांनी आपल्या आयुष्यात फोडाफोडीचे जे काही राजकारण केलं ते आता त्यांच्या वाट्याला आलं आहे हे निश्चित..!