विजय जगताप
‘कधी तरी कृपा होईल, नेत्यांना माझे काम आवडेल आणि ते मला संधी देतील’ तुम्ही या अपेक्षेत असाल तर राजकारणासारख्या प्रांतात तुमचं काही काम नाही. जेव्हा आपल्या पंखात उडण्याचं बळ आता आलंय, अशी स्वत:लाच खात्री पटते तेव्हा धाडसाने बिनधास्त उडान घ्या..! ही काही मॅनेजमेंटच्या वर्गातील किंवा ‘यशस्वी कसं व्हावं’ या पुस्तकातली उदाहरणं नाही. तर जिद्द, निश्चय, साहस आणि आव्हान देण्याची पण आणि आव्हान स्विकारण्याची पण ताकद असलेल्या पिंपरी चिंचवड या शहराचे ‘पिता’ अशी प्रतिमा निर्माण केलेल्या लक्ष्मण जगताप या व्यक्तिमत्वाचा हा आलेख आहे. आज त्यांचा वाढदिवस. बातमी खास टिमच्या वतीने त्यांना शुभेच्छा..!
आपल्या हिमतीवर राजकारणाचा आयाम तर त्यांनी बदलला आहेच शिवाय पुढारी ही संकल्पनाच सध्याच्या हायटेक जमान्यात कालबाह्य ठरवून एक नवा बदल, नवा संकेत त्यांनी आपल्या पेहरावातून आणि व्यक्तिमत्वातून सिद्ध करून दाखविला आहे.
सुक्ष्मपणे जर अभ्यासले तर अनुभवातून, लोकअभ्यासातून एक परिपक्व व्यक्तिमत्व घडू शकते आणि घडवताही येते आणि जर राजकारणाची पार्श्वभूमी त्याला असेल तर ‘स्वत:च आपले शिखर बनवा आणि त्यावर स्वार व्हा…’ असे लक्ष्मण जगताप यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवते. अब्राहम लिंकनचे एक वाक्य आहे, पंचतारांकित हॉटेलमधल्या नामांकित कुकच्या नुसत्या स्पर्शाने व अस्तित्वाने देखील त्या पदार्थाची रंगत फुलत असते. त्याचप्रमाणे सलग ३२ वर्षे लोकांच्या गराडयात, जनतेचे प्रश्न सोडवण्यात व ते मार्गी लावण्यात इतकी हातोटी व इतकी सहजता लक्ष्मण जगताप यांना लाभली आहे की नुसत्या नजरेवरून ते समोरच्याचे काम काय असेल? हे ताडतात. यामधून त्यांची थोरवी गायची, किंवा ते किती असामान्य आहे हे दाखवून दयायचे असे नाही तर ही कमांड, ही बैठक, ही सहजता लोकांकडूनच शिकायला मिळते व ग्रहण करता येते. लक्ष्मण जगताप यामध्ये पारंगत झालेत हे वास्तव आहे.
राजकारणात सक्सेसच्या शिडीवर पटकन चढायचे असेल तर अचूक वेळी शक्ती, ताकद व डेअरींग दाखविता आली पाहिजे. मला आठवतंय, ज्या थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नुसत्या उपोषणाच्या पावित्र्याने सरकारे हादरतात त्या अण्णांना रोखण्याची व जाब विचारण्याची हिम्मत लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष असताना दाखविली होती. औंध येथील शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांचा मनमानी कारभार असो की नोकरशाहीला मग तो आयएएस असो की आयपीएस त्याला सूतासारखं सरळ करण्याचे धाडस, हा त्यांच्या यशाचा युएसपी रेटींग म्हणावा लागेल.
जगताप यांना प्रत्येक वेळा संघर्ष करूनच स्वत:ला सिद्ध करावं लागलं आहे. २००५ साली विधानपरिषदेच्या निवडणूकीत पिंपरी चिंचवडचा एक नगरसेवक एवढीच ओळख असताना त्यांनी आख्ख्या जिल्हयातून मते खेचून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा त्यांनी पराभव केला होता. यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या गुणांचा त्यांनी वापर करून स्वत:ची योग्यता व पात्रता सिद्ध केली होती. तेव्हा भाजप-सेनेचे निष्ठावान म्हटले जाणारे नगरसेवकही अंकुश लांडगे यांचा मंडप सोडून त्यांच्यामागे धावले होते. राजकारण हे असं क्षेत्र आहे की जिथं थांबायला, वाट पहायला वेळ नाही ते जर थांबले असते तर २००९ ला विधानसभेवर निवडून गेले नसते. काळाचा, परिस्थितीचा अचूक आडाखा अवगत झाल्यानेच २०१४ ला ही त्यांनी भल्या भल्यांची बोबडी वळेल अशी देशातील संसदेची शिडी चढण्याचा निर्णय घेतला मात्र तत्कालीन मोदी लाटेत पालापाचोळ्या सारखे काँग्रेससह सगळे पक्ष देशभरात झोपले मात्र त्या लाटेतही ३ लाख ५४ हजार मते मिळवून ते निकालाच्या कागदावर फक्त हारले मात्र जनतेच्या हृदयसिंहासनावर जिंकले हे वास्तव कोणालाही मान्यच करावं लागेल.
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय असो की भाजपचे शहर अध्यक्ष झाल्यानंतर या शहरात भाजपची सत्ता आणण्याचा निर्णय असो आपल्या क्षमतेच्या खोलीचा अंदाज आल्यानेच ते शहरावर राज्य मिळवू शकले. निवडणूक जिंकणं ही कला आहे, आर्ट आहे, नुसतंच कागदावर मांडलेलं गणित नाही तर रणांगणांवर जी शस्त्रे लागणार आहेत त्याची तयारी करणं व ती आपल्या भात्यात ठेवणं हेच निवडणूक जिंकण्याच रसायन असतं. वर्ष-दिड वर्षापूर्वी त्यांनी आपला लूक आणि स्टाईल बदलून पंचवीस वर्षाच्या तरूणालाही लाजवेल असं शरीर बनविलं आहे.
चौथीच्या पुस्तकात फार पूर्वी एक धडा होता गंगाराम हा गाढवाबरोबर पायी चालला तरी लोकं टिका करतात, गाढवावर बसला तरी नावंच ठेवतात असं मानवी वर्तनाचं सूत्र या धडयात होतं. मॉडेल मिलिंद सोमण सारखी स्टाईल, क्रिकेटपटू शिखर धवनसारखी चपळता त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:मध्ये निर्माण केली आहे. लोकांना काय कुटाळक्या, गावगप्पा झोडायच्या त्या झोडू देत.. ‘अपून को फिकर नही’ या त्यांच्या अंदाजाला दाद दयावीच लागेल.
चरित्र, चारित्र्य, नैतिकता व आचरण या सिद्धांतावर लोकनेता बनलेल्या लक्ष्मण जगताप यांनी आता पकड बसविली आहे. राज्यव्यापी पातळीवर ठसा उमटवायला त्यांना संधी मिळेल अथवा न मिळेल परतू देशपातळीवर व राज्यस्तरावर नेते म्हणून मिरवणाऱ्यांना त्यांनी ‘ही भूमी आमची आहे, आता आमचं राज्य सुरू झालंय’ हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.