(विजय जगताप)
महाविकास आघाडी सरकार असं केलं तरच कोसळणार? याची पटकथा फडणवीस यांनी लिहिली, त्याप्रमाणे डायरेक्शनही केले, परंतु अचानक त्यांना उपमुख्यमंत्री बनायला सांगून भाजप श्रेष्ठींनी त्यांची देशातील तिसऱ्या स्थानावर पोहोचू पाहणारी दावेदारी संपुष्टात आणून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी अभ्यासू व्यक्तिमत्त्व, तूफान वक्तृत्व,आणि भाजपचा महाराष्ट्रातील क्रमांक एकचा चेहरा असे अष्टपैलू गुण असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लावण्याचा प्रकाराबद्दल संघ तसेच भाजपला मानणारा बहुसंख्य वर्ग नाराज झाला असल्याचे चित्र आहे. वास्तविक अजित पवारांबरोबरील पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ७२ तासात सरकार कोसळलं, त्यामुळे फेल गेलेल्या आपल्या प्लॅनबद्दल मागील अडीच वर्षात फडणीस यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती. मात्र कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू द्यायचा नाही, या जिद्दीला फडणवीस पेटले होते.
एका प्रयोगात मी फेल गेलो असलो तरी असं काही घडवेन की पंतप्रधान मोदी व शहा पाहतच राहतील या इर्षेने ते उद्धव यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासूनच खरं तर कामाला लागले होते. “मी पुन्हा येईन..” या त्यांच्या घोषणेची टिंगल होत असली तरी ते आपल्या व्यूहरचनेत मात्र गर्क होते. अखेर २१ जूनला मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आणि आपले फासे अचूक पडलेत याची खात्री फडणवीसांना झाली. परंतू आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी होता कामा नये व समतुल्यही होऊ नये हा सगळ्या क्षेत्रात असलेल्या मतप्रवाह व मानवी गुणधर्म फडणवीसांच्या ही अखेर वाट्याला आलाच..!
आज देशातील सर्वात बलाढ्य व मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून संपूर्ण देश पाहतो. स्व.प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर बुद्धिमान, संघटन चातुर्य, वक्तृत्व, उच्चशिक्षित आणि कृषी ,सहकार व अर्थ या विषयी प्रचंड ज्ञान असल्यामुळेच भाजपच्या देशातील चौथ्या क्रमांकावर फडणवीस आपसूकच पोहोचले होते.
दिड वर्षांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यशस्वी काम, त्यानंतर गोव्याच्या निवडणुकीत सर्वोच्च जबाबदारी आणि तिथेही भाजपची सत्ता आणल्यानंतर फडणवीस यांच्याकडे देश मोठ्या आशेने पाहत होता.
एकनाथ शिंदे हे सेनेत अस्वस्थ आहेत व ते गळाला लागले तरच आपले “मी पुन्हा येईन” हा संकल्प फत्ते होईल व स्वप्नपूर्ती होईल याची खात्री फडणवीसांना होती. २०१४ ते २०१९ या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री( उपक्रम) असलेले एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला वेगात पूर्णत्वाच्या दिशेने नेल्याने फडणवीस हे शिंदे यांच्यावर त्या काळात विशेष खूश होते. २०१९ मध्ये मात्र अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सरकार बनलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने व शिवसेना पक्ष संघटनेतही आदित्य ठाकरे यांचा बोलबाला वाढला. ४० वर्ष सेनेत घालवून झाल्यानंतर आपण आता नव्या पोरांच्या हाताखाली आता पालख्या व्हायच्या का ? या विचारापर्यंत आलेल्या शिंदे यांची दुखरी नस फडणीस यांनी अडीच वर्षांपूर्वी अचूक हेरली.
एकेकाळी सेनेच्या सावलीवर वाढलेल्या भाजपला २०१४ नंतर मात्र आपल्या हिंदुत्वाच्या राष्ट्रीय अजेंड्यावर सेनेसारखा भागीदार नको होता.
खरं तर एकनाथ शिंदे यांना फोडण्याची पटकथा २०१४ मध्येच फडणविसांनी लिहिली होती परंतु तेव्हा अगोदर काही महिने विरोधी पक्षात बसलेल्या सेनेने नंतर अचानक भाजप बरोबरच या सत्तेत दुय्यम स्थान स्वीकारत सहभाग घेतला. खरं तर सेना तेव्हाच फुटता फुटता राहिली होती. वास्तविक सेनेला आता आपल्या मागे फरफटत आणायचंच असा चंग तेव्हाच फडणीसांनी बांधला होता व म्हणूनच २०१४ ते २०१९ या काळात उपमुख्यमंत्रीपद जाणीवपूर्वक निर्माण होऊ दिलं नव्हतं.
पण काळाचा व नियतीचा बदला म्हणा की योगायोग म्हणा, आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद त्यांना स्वीकारणं भाग पडणं हा फडणवीसांवर नियतीने उगवलेला सूडच म्हणावा लागेल.