( विजय जगताप)
कार्यकाळ संपलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप सत्तेच्या काळात पैसा- प्रतिष्ठा आणि मान- सन्मान यामध्ये १२८ नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांची खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे.
विलास मडिगेरी, सचिन चिखले,माई ढोरे व प्रमोद कुटे अशी या चौघांची नावे आहेत. आज महापालिकेला अलविदा केलेल्या या १२८ नगरसेवकांपैकी पुन्हा किती जण परत निवडून येतील या प्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेच नसले तरी छाप पाडणारी ( व गांधी बाबा छापणारीही ) कामगिरी यांच्या नावावर नोंदली गेली आहे.
या चौघांशिवाय अन्य देखील नगरसेवकांची या पाच वर्षांत ठशीव व लक्षवेधी कामगिरी जरूर झाली,खो-याने पैसा देखील बाकीच्यांनी जरूर मिळविला पण नशिबाची कृपा व झोळीत न मागता पडलेल्या मोहरा यामध्ये वरील चौघेच भाग्यवंत ठरले.’आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.. ‘याची प्रचिती या चौघांशिवाय अन्य कोणालाही साधता आली नाही हे वास्तव आहे.
हे चार नगरसेवक कसे लकी ठरले हे आता विस्ताराने पाहू या.. सर्व प्रथम सचिन चिखले या मनसे नगरसेवकांबद्दल..! हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक. हेच पक्षाचे शहराध्यक्ष पण व पालिकेतील मनसेचे होल ॲन्ड होल…! पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आले आणि पालिकेत पक्षीय बल व महापालिका अधिनियमानुसार स्मार्ट सिटी कंपनीवर संचालकपदी त्यांची वर्णी लागली. प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाचा समावेश करायचा असल्याने डोळे झाकून चिखले यांचा येथे नंबर लागला.
वास्तविक ते एकमेव नगरसेवक असल्याने स्थायी समिती तर लय लांब अन्य कुठल्याही पदांवर वा कमिटीवर उभ्या पाच वर्षांत त्यांना संधीच मिळाली नसती. मात्र स्वतंत्र कंपनी म्हणून स्मार्ट सिटीची निर्मिती झाली आणि त्यांचा जॅकपॉट लागला.
पाच वर्षांत या कंपनीची १२ अब्ज ५० कोटींची कामे मंजूर झाली.पैकी ७ अब्ज ५० कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या.तर ६ अब्ज ५५ कोटींची बिले निघाली आहेत. इनमीन सहा सदस्य ( महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेते, सेनेचे एक नगरसेवक व सचिन चिखले) बाकी सारे अधिकारी मंडळींच या कमिटीवर..! पालिकेत टक्केवारी कशी चालते याची माहिती असणा-या सुज्ञ नागरिकांना या फिगरचा हिशोब करता येईल.
दुसरे भाग्यशाली नगरसेवक आहेत शिवसेनेचे प्रमोद कुटे.
ध्यानी मनी नसताना इनमीन संख्या असलेल्या सेना नगरसेवकांच्या पंक्तीत उभे असलेल्या कुटे यांना हत्तीनेच वरमाला घालावी असा काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला. स्मार्ट सिटी कंपनीचे संचालकपद शोधत त्यांच्या पर्यंत आले.झाले असं की ,आमदार लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे राहुल कलाटे हे एकमेकांचे राजकीय दुश्मन. मातोश्रीवर व सेनेच्या खास मंडळींकडे विशेष वट असलेल्या कलाटे यांनी स्मार्ट सिटीवर आपल्या नावाची शिफारस आणली. मात्र सत्ताधारी असलेल्या भाजपने सापाला दूध पाजण्याचा प्रयोग न करता सेनेच्या प्रमोद कुटे यांना स्मार्ट सिटीवर नेमले. या निर्णयाविरोधात कलाटे यांनी प्रचंड आकांडतांडव केले, कोर्टा पर्यंत मजल मारली,पण काही उपयोग झाला नाही.इकडे दारात चालून आलेली संधी कुटेंनीही सोडली नाही.’पक्ष गेला तेल लावत.. अशीच भावना कोणाचीही होईल तसं कुटे यांचं झालं असावं. त्यांनी पदत्याग तर केला नाहीच व हे पद आपल्या वाट्याचं नाही अशी खंतही बाळगली नाही. स्मार्ट सिटीत गेल्यानं तीन देश फिरण्याची संधी या कमिटीवरील सदस्यांना मिळाली.( पालिकेने फक्त बार्सिलोना, स्पेन चा खर्च केला होता अन्य दोन देश या मंडळींनी लग्नात मुंज उरकावी तसे उरकले होते.)
विशेष म्हणजे याच स्मार्ट सिटीतील कामात कसा भ्रष्टाचार व झोल झाला याचा गौप्यस्फोट सेनेचे योगेश बाबर यांनी केला होता तर सेनेचे खासदार बारणे यांनी संसदेत त्यावर आवाज उठविला होता.
तिसऱ्या भाग्यशाली आहेत माई ढोरे.भाजपने आपल्या सत्ताकाळात पहिल्या अडीच वर्षांत दोन महापौर केले. उर्वरित अडीच वर्षांपैकी सव्वा वर्ष माई ढोरे यांना महापौरपद देण्याचं ठरलं होतं.परंतू कोरोनाचे संकट त्यांना खऱ्या अर्थाने पावले. सव्वा वर्षात कोरोनात काम करण्याची संधी न मिळाल्याने त्यांना मग फुलफेज अडीच वर्षे महापौरपदाची मिळाली. त्यांना बदलण्याच्या मध्यंतरी हालचालीही झाल्या, प्रबळ दावेदार असलेल्या अन्य इच्छुक महिला नगरसेविकांनी दबावाचे प्रयत्नही केले. मात्र भाकरी फिरविण्याचा प्रयत्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला नाही. १९९२ पासून नगरसेविका असलेल्या माई ढोरे यांनी महापौर होण्यापूर्वी उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमआरडी सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या व भाजप सत्तेच्या काळात अडीच वर्षे महापौर असा ‘छप्पर फाडके न भूतो न भविष्यती पदांची मालिका पटकविली. शिवाय महापौर या नात्याने स्मार्ट सिटीवरही त्यांना काम करता आले.त्यांच्या कामाचे मूल्यमापन हा तसा स्वतंत्र विषय आहे. पण सुपर लकी म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
चौथे लकी नगरसेवक आहेत विलास मडिगेरी. गाववाले सोडून इतरांना पालिका तिजोरीतून चिल्लर देखील न घेऊ देण्याची काळजी कारभारी असलेल्या महेश लांडगे व लक्ष्मण जगताप या दोन आमदारांनी पुरेपूर घेतली होती. मात्र नशिब घेऊनच हे जन्मले असावे असेच म्हणता येईल. मितभाषी असलेल्या ममता गायकवाड या स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात ते सदस्य होते. पण सदस्य असूनही खऱ्या अर्थाने स्टॅण्डींग चालविली ती मडिगेरींनीच…! ममता गायकवाड स्थायी अध्यक्षा जरूर होत्या. पण चतूर बिरबिलाप्रमाणे त्या संपूर्ण वर्षाचा राजकारभार चालविला तो फक्त मडिगेरींनीच…! त्यांचे नशिब पहा, भाजपच्या कारभाऱ्यांनी सर्वांना स्थायीत काम करायला मिळावे म्हणून प्रत्येकास एकच वर्ष स्थायीत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु फासे पलटले आणि कारभाऱ्यांना आपल्याच निर्णयाला छेद द्यावा लागला.निषठावंतांना पद द्यायचे या निकषावर मडिगेरींना स्थायी अध्यक्षपद देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि एक वर्षाचा केलेला नियम कारभा-यांना बासनात गुंडाळावा लागला. ममता गायकवाड यांच्या काळात स्थायी समितीवर पीएचडी झालेले विलास मडिगेरी हे स्वतःला अध्यक्षपद मिळाल्यानंतर स्थायी समिती विद्यापीठाचे कुलगुरूच बनले. तास मिनिटेच काय सेकंदाचा एक क्षणही त्यांनी वाया घालवला नाही. रात्रीचे दहा-अकरा वाजेपर्यंत स्थायीच्या अभ्यासात गर्क होत ते पालिकेतच थांबायचे. इतकी सेवा केलेले ते एकमेव स्थायी समिती अध्यक्ष ठरले.