( विजय जगताप)
शत्रूने उचल खायच्या आत त्याचे नकली दातच काढून टाकायचे व कवळी दाखवून देण्याच्या केलेल्या प्रयत्नात शत्रूच मोठा झाल्याचा काहीसा प्रकार शुक्रवारी पिंपरीत घडला.
निमित्त होते, ‘भाजप गो बॅक’ अशी आरोळी दिलेल्या शहर राष्ट्रवादीच्या मोर्च्याचे…! पिंपरी महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील लहूजी वस्ताद पुतळा ते महापालिका भवन अशा मोर्च्याचे आयोजन केले होते. हा मोर्चा हाणून पाडण्यासाठी व राष्ट्रवादी हा पक्षच कसा भ्रष्ट आहे हे “ उल्टा चोर कोतवाल को डाॅंटे” या उदाहरणासह दाखवून देण्यासाठी भाजपच सर्वात जास्त कामाला लागली.
वास्तविक फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा फुल्ल राष्ट्रवादीच्याच घडामोडींनी शहराच्या कॅनव्हासवर फुल्ल रंगला व मिडियातही गाजला.
अजित गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी झालेली निवड , तसेच शहर युवक अध्यक्ष , शहर महिला अध्यक्ष हे भोसरी भागातीलच असणं यावर निर्माण झालेले चर्चेचे वातावरण,लगेच दुस-या दिवशी भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांची विकेट पडणे व भाजप गांगरून जाणे, २४ तासात लगेचच अजितदादा पवार यांचं त्यांना पंखाखाली घेणे या घडामोडींनी राष्ट्रवादीचा व्हाॅल्यूम या आठवडयात गाजला.
अस्वस्थ झालेल्या भाजपने एकीकडे बोराटेंना कुरवाळण्याचाही प्रयत्न करणे व दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याने आपणास काहीच फरक पडत नाही अशा दोन्ही कृती एकाचवेळी दाखवून देत आपल्याला शाॅक बसल्याचेच दाखवून दिले. वास्तविक नाही तरी गेली पाच वर्षे आपलेच काही नगरसेवक थेट आपल्याच पक्षावर हल्ला करत जमेल तसं व दिसेल तिथं ठोकून काढत असताना भाजपा निमूटपणे हे सगळं पाच वर्षे झेलतच होता.पण बोराटेंमुळे गडाची चीर ढासळली असे उघडपणे जाणवून देण्याचे कामच भाजपने केले.
अशातच भाजपच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारावर मोर्चा काढण्याचे राष्ट्रवादीने ठरविताच भाजप त्यांच्या मोर्च्याची खिल्ली उडविण्याच्या कामाला लागली.
सोशल मिडियात ‘भ्रष्ट राष्ट्रवादी ‘अशा इमेज व व्हिडीओ बनविण्यात येऊन आम्हाला नावे ठेवण्याऐवजी तेच कसे नालायक आहे हे दाखविण्याच्या कामाला भाजपाची सोशल मिडिया टीम लागली.
राष्टवादीच्या मोर्च्याची हवा काढण्यासाठी भाजपचा सोशल मिडिया सेल, बातम्या पेरणारा व बातम्या माध्यमांना पुरविणारा सेल या मोर्च्याच्या फुसक्या बाजू सांगण्याच्या कामासाठी ‘सबसे तेज’ कामाला लागला.मोर्चा संपल्यानंतर लगेचच भाजपच्या पालिका पदाधिका-यांनी व पक्ष पदाधिका-यांनी आपल्या मुलाखतीचे व्हिडीओ प्रसारीत करून त्यांची चेष्टा व टर उडविली.
शहरातील लाखो नागरिकांना या मोर्च्याचे देणंघेणं नसताना त्यांना जागे करून भाजपने आपल्याच पायावर दगड हाणला.’राष्टवादीने आज मोर्चा काढला होता ‘असे सांगत एक प्रकारे राष्ट्रवादीलाच हिट करून टाकले.
नितीन लांडगे यांना अटक झाल्यापासून तसं पाहिलं तर मागील वर्षभरापासून भाजप विस्कळीत झाल्याचे व बदनाम झाल्याचे चित्र होतं.त्यात भर म्हणजे मागील आठवडयात केशव घोळवे यांना अटक झाल्याने तर या अस्वस्थतेच्या आगीत अजून तेल पडले.
निवडणूक तोंडावर असल्याने राष्ट्रवादीची ही कृती साहजिकच आहे असे समजून दुर्लक्ष करणे व मागील पाच वर्षात भक्ती शक्ती उड्डाण पुल, हेरिटेज डेव्हलपमेंट, ग्रामीण भागाचा केलेला अचंबित करणारा विकास, भामा आसखेड वरून पाणी आणण्याची योजना, सिमेंटच्या रस्त्यांचे विणलेले जाळे,स्मार्ट सिटी योजनेतून झालेली कामे, पाच वर्षात २० हजार कोटींची झालेली झालेली पायाभूत विकासकामे हे दाखवून देणे, त्याचा प्रचार व प्रसार करणे हे अपेक्षित होते, पण झालं भलतंच, तो चोर सांगण्याच्या नादात हात दाखवून अवलक्षण झालं..!