( विजय जगताप)
नगरसेवकपदावरून थेट संसदेत पोहोचलेले व आजच्या घडीला पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचा चेहरा आणि आवाज असलेले खासदार श्रीरंग बारणे यांचा आज वाढदिवस.
सेनेचा शहरातील आलेख स्थिर व घटलेला असलेला तरी खासदार बारणे यांचा कार्यरूपी भूगोल कमी न होता वाढतच आहे.
दिल , दोस्ती व दुनियादारी यासाठी काहीही करायला तयार असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा बारणे.राजकारणात उडी मारण्याअगोदर तरूण वयात मित्रांच्या मदतीने वीटभट्टी व बांधकाम व्यवसाय-धंदयात ते स्थिरावले.आणि राजकारणात आल्यानंतरही मैत्रीसाठी आपले राजकीय आयुष्य पणाला लावत काॅग्रेस पक्षाला सोडण्या पर्यंतची डेअरींग केलेले श्रीरंग बारणे हे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व..! आप्पा या नावाने परिचित असलेल्या बारणे यांचा राजकीय प्रवास खाचखळग्यांनी भरलेला आहे. शिवसेना पक्षात २००९ ला आलेल्या आप्पा बारणे यांनी लगेचच नव्याने निर्माण झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली, मात्र तेथे पराभव वाटयाला आला.पुढे नंतर २०१४ ला मावळ लोकसभा लढवून पिंपरी चिंचवड शहरात सेनेला आपल्या नावाने व वलयाने त्यांनी बळकटी मिळवून दिली आहे. तेव्हाच्या प्रखर मोदी लाटेत आप्पा संसदेत पोहोचले.
पिंपरी चिंचवड हा बहुभाषिक परिसर…! या भागात शिवसेनेला मानणारा व निष्ठावंत म्हणता येतील अशी सुमारे २ लाख मतांची ताकद असलेला पक्षाचा हक्काचा मतदार वास्तव्यास आहे. महापालिका निवडणूक असो की विधानसभा की लोकसभेची निवडणूक सेनेच्या पारडयात मतांची श्रेणी आजपर्यंत नेहमी चढ-उताराची ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गडात शिवसेनेला बारणे यांच्या रूपाने मोठी उभारी आणि हुरूप आला आहे.वास्तविक एप्रिल २००९ मध्येच मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात तेव्हा शिवसेनेचे गजानन बाबर व शिवाजीराव आढळराव पाटील या दोन खासदारांनी पुणे जिल्हयातील राष्ट्रवादीच्या राजकीय गडाला सेनेची तटबंदी घातली होती. बारणे यांच्या रूपाने सेनेची ताकद एक बलाढय स्थानिक नेता लाभल्याने बळ निर्माण करणारी ठरली.
जिद्दीने व चिकाटीने पक्ष बळकटीला बारणे यांनी प्राधान्य देत सेना नेत्यांच्या हृदयात व विशेषत: मातोश्रीमध्ये आज आपले वजन निर्माण केले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष मर्जीत स्थान मिळविलेल्या बारणेंच्या रूपाने शिवसेनेला एक डॅशिंग, अभ्यासू, स्थानिक गाववाला खासदार लाभलाय.खासदार झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासूनच मतदारसंघातील प्रश्न असो, शून्य प्रहर असो, प्रश्नोत्तरांचा काळ असो की अर्थसंकल्पावरील चर्चा असो आपला ठसा सलग सात वर्षात उमटवून बारणे यांनी संसदरत्न हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग सहा वेळा मिळवून विक्रम केलाय.
एक ठशीव कामगिरी लोकसभेत आप्पा बारणे यांनी उमटविली असली तरी २०१७ च्या पिंपरी महापालिका निवडणूकीत बारणे यांना चहू-बाजुंनी घेराव घालत लक्ष्मण जगताप यांनी पुन्हा सेनेची धूळधाण उडविली होती.आज विशेषत: थेरगाव या बारणेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले गेले आहे.
पालिका निवडणूकीतील पराभवाचे शल्य बारणे यांना सलत असले तरी त्यांनी हार न पत्करता शिवसेनेची संघटनात्मक धूरा नव्याने हाती घेतली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या आप्पा बारणे यांनी स्थायी समिती सभापतीपद मिळवून आपल्या डॅशिंग नेतृत्वाची प्रचिती करून दिली होती. ज्या ज्या वेळीस प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळी आव्हानाशी मुकाबला करण्यास बारणे समर्थ ठरत गेलेत असा इतिहास आहे. शहरातील राजकीय वर्चस्ववादाच्या लढाईत बारणे सध्या पिछाडीवर असले व संसदेत मावळवीर ठरले असले तरी, त्यांना घेरण्यास भाजपने अलिकडील काही दिवसात मोठी मोहिम हाती घेतली आहे. आपल्या सातत्यपूर्वक कामांच्या बळावर लक्षवेधी कामगिरी बारणेंनी जरूर केली आहे. पुणे जिल्हयात विशेषत: मावळ मध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच खासदार आणण्यासाठी सध्या होत असलेली व्यूहरचना उलटून टाकण्यासाठी बारणे विस्कळीत झालेली सेना घेवून कसे लढतात व आव्हान देतात ? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.कारण ज्या पार्थ पवार यांचा पराभव करून आप्पा बारणे यांनी मैदान मारले होते आता तेच पार्थ व राष्ट्रवादी काँग्रेस हे सेनेचे महाविकास आघाडीतील मित्र बनले आहेत.
नुकत्याच झालेल्या देहू नगरपंचायत निवडणूकीत सेनेला मिळालेला भोपळा , तर सेनेच्या नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश , राहुल कलाटे या सेनेमधील समांतर नेतृत्वाची त्यांच्याशी न जुळणारी गोळाबेरीज, लवकरच सेनेचे आप्पा बारणे यांच्या अतिशय जवळचे नगरसेवक सेनेतून बाहेर पडणार असल्याची होत असलेली चर्चा या सा-या गोष्टी पाहता सेना सांभाळताना जिगरबाज मावळवीर बारणेंची कसोटी पक्षाला लागणार आहे.इतर पक्ष जसे जिंकण्यासाठी हात ढिल्ला सोडतात व थैल्या मोकळया करतात तसा प्रयोग सेनेने करून पाहिला तर संजय राऊत मागे पिंपरीत येऊन बोलल्याप्रमाणे सेनेचा महापौर होऊदेखील शकतो. त्यासाठी सेनेने मुंबई व ठाणे महापालिकेइतकाच जीव पुण्यावर व पिंपरीवर लावायला हवा.