(विजय जगताप)
अॅंटीकरप्शनच्या रंगेहात जाळयात सापडल्यानंतर शहर भाजपची राज्यभर होत असलेली बदनामी तसेच कारभारी असलेल्या दोन आमदारांविषयी अगोदर पासूनच असलेली सुप्त नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. या घटनेनंतर आता जाहीरपणे कार्यकर्ते सोशल मिडियात ‘ओकू’ लागल्याने मोरीला बोळा लावूनही उपयोग होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आज दुपारीच स्थायी समिती अध्यक्ष ॲड नितीन लांडगे यांची जामिनावर सुटका झाल्याने एकदाचा शहर भाजपच्या नेत्यांनी व गावकी-भावकीने सुस्कारा सोडला आहे.मात्र आपल्या पुढ्यात अजून काय काय वाढून ठेवलं आहे या विचाराबरोबरच आता ‘डॅमेज कंट्रोल ‘ कसं करायचं, या तयारीला शहरासह राज्य भाजपही कामाला लागली आहे. पालवी फुटावी तसा आत्ताच सजग व सक्षम झालेला विरोधी पक्ष या संधीचा फायदा उठविणार ?की तलवार म्यान करणार… ? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
या सा-या घटनाक्रमात सर्वाधिक झळ व लोकांची वक्रदृष्टी जर कोणाला सोसावी लागली असेल तर ती म्हणजे भोसरीतील प्रतिष्ठीत लांडगे घराण्याला…! या महापालिकेच्या इतिहासातील पहिले महापौर असा मान असलेले ज्ञानेश्वर लांडगे यांच्यापाठोपाठ आता या शहरातील ॲटीकरप्शनच्या जाळयात सापडलेले इतिहासातील पहिले त्यांचे पुत्रच निघावेत यासारखी खेद व्यक्त करावी अशी दुसरी घटना नाही. गाववाल्यांमध्ये शहरात कोणालाही नाही इतकी प्रतिष्ठा व मान सन्मान या घराण्याच्या वाटयाला आहे.पवना सहकारी बॅक असो की आकुर्डीत असलेले इंजिनअरींग काॅलेज…. शहराची शान व प्रतिष्ठा असलेल्या यासारख्या विविध संस्था ताब्यात असलेल्या या कुटुंबाच्या वाटयाला टिचभर पैशासाठी मानहानी सोसायला यावी हि दु:खदायक बाब आहे .
राजकारण व राजकारणातून मिळणारा पैसा यापेक्षा कितीतरी पट पत असलेल्या या घराण्यातले नितीन लांडगे यांना स्थायीतून मिळणा-या पैशांचे ना आकर्षण होते ना लोभ…! प्रतिष्ठेसाठी हे पद त्यांनी स्विकारले खरे मात्र त्यांना रितीरिवाजाप्रमाणे या पदावर काम करावे लागत होते.आपण पालिकेच्या तिजोरीचे मालक आहोत असा कुठलाही दर्प त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीच नव्हता. या अगोदर जे भाजपचे स्थायी अध्यक्ष होऊन गेले त्यापैकी कोणी जरी अशा घटनेत सापडले असते तर राष्ट्रवादीपेक्षा जास्त आनंद खुद्द भाजपमधीलच पदासाठी गळ टाकून ठेवणा-या काही मंडळींना झाला असता? हे निर्विवाद सत्य आता बोलले जात आहे.
असो, पण या घटनेनंतर शहर भाजप अस्वस्थ झाली काय? तर ते शंभर टक्के सत्य आहे.आजवर केवळ निवडणूक आली की फक्त कमळ आहे ना मग बास..असे म्हणत उमेदवार कोणी का असेना …असे मानत आलेले देखील सोशल मिडियात गुरगुरू लागले आहेत.भोसरीतील एका महिला पदाधिका-याने तर फेसबुकवर “ भाजपची पालिकेत सत्ता परंतू सत्तेत भाजप नाही” अशी पोस्ट टाकून जाहीरपणे पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
चिंचवड भाजपमधील मंडल व बुथ प्रमुख असलेल्या मंडळींनी देखील आपापल्या व्हाॅटसअप ग्रुपवर पंक्तीला बसावे तसे सकाळ-संध्याकाळ नाराज आरत्या गायला सुरूवात केली आहे.
घरात बायकोकडून देखील किंमत न मिळणारा आता या घटनेनंतर दोन्ही आमदारांनी साडेचार वर्षात ‘स्वाभिमान’दिला नसल्याचे छाती काढून सांगू लागला आहे.
“घर फिरलं की घराचे वासे फिरतात”अशी एक म्हण आहे.त्याचा आता प्रत्यय येत आहे.
राजकीय विश्लेषक व शिवसेनेचे राज्य संघटक असलेले गोविंद घोळवे यांनी बातमी खासशी व्यक्त केलेल्या मतानुसार , या शहरात भाजपचा केडर बेस अवघा २० टक्के आहे. ज्यांना आमदार जगताप व लांडगे यांच्याशिवाय पालिकेवर सत्ता आणणे तर दूरच तो केडर बेस काठावर पण भाजपला पोहोचवू शकत नाही.त्यामुळे पक्षाची कितीही बदनामी झाली तरी या दोघांवर डोळे वटारण्याची देखील हिम्मत भाजप पक्षश्रेष्ठींमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे.’