(विजय जगताप)
नैराश्य, ताण तणाव यापासून सुटका कशी करायची,याचे मार्गदर्शन व धडे देणा-या शितल आमटे अवघ्या काही महिन्यात स्वत:च त्याच्या शिकार ठरल्या.
आनंदवन या नावाच्या संस्थेने चंद्रपूरसारख्या नक्षलवादी भागात महारोगी असेल, आदिवासी असेल की वंचित घटकाचा कोणीही त्याच्या जीवनातील दु:ख दूर करत आनंद पेरण्याचे काम केले व आजही करते आहे.केवळ भारतच नाही आख्ख्या जगात थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी या संस्थेला लोकप्रिय केले. त्यामुळे आमटे हे आडनाव समाजसेवेतील नोबेल ठरले गेले.
आमटे आलेत असे नुसते म्हटले तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अदबीने उठून उभे रहावे,इतका सन्मान आपल्या कार्यातून या परिवाराने मिळविला. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची खैरात असो की मान सन्मान ढीग भरून या परिवारास व संस्थेला मिळाले. देणग्या घ्यायला वेळ नाही,असं भाग्य वाटयाला आलेली ही जगातील एकमेव संस्था असेल.
परंतू म्हणतात ना घर फिरले की घराचे वासेही फिरतात तसे या संस्थेच्या बाबतीत झाले आणि जेव्हा बाबा आमटेंच्या निधनानंतर तिस-या पिढीच्या हाती संस्थेची सूत्रे आली तेव्हा संस्थेचे स्वरूप कार्पोरेट क्लचरचे होत गेले. संस्थेच्या कारभारातील गोंधळ, आरोप, अफरातफर ही धुणी पोलिस चौकीपर्यंत पोहोचली.वृत्तपत्रांना खुराक मिळाला आणि भाऊबंदकीतील हा वाद चावडीवर आला.
आरोप आणि भांडणे वेशीबाहेर होत असती तर एकवेळ समजू शकते पण कुटूंबात एकदा कलह सुरू झाला तर मग ते आमटेंचे असो की अंबानीचे कुटूंब ठिणग्या ह्या उडणारच..!
संस्था असो की घर एकदा का भांडणे, पैशांचे वाद आणि स्वार्थ घुसला की राखरांगोळी होते.मोह, माया, क्रोध यावर जेथे शिकल्या सवरल्यांना विजय मिळविता येत नाही त्यांनी मग झोपडपट्टीत चालणा-या भांडणावर बोलू नये व नावेही ठेऊ नये.तुमचे वाद जर पैसा, प्रतिष्ठा यासाठी घरातच होत असतील तर तुम्ही कसले शिकलेले???
हल्ली तर कुटूंबात संवाद नाही पण सोशल मिडियात संवाद व्यक्त करायचा ही नव्या पिढीची भलतीच फॅशन होऊ लागली आहे.
शितल आमटे यांनी जीवन संपवून चूक तर केलीच पण त्याचा परिणाम म्हणजे अस्मिता व प्रतिक असलेल्या देशातील या संस्थेला आता तडा मारला गेला आहे.
अेबीपी माझा या चॅनेलवर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ताणतणावातून बाहेर कसे पडायचे यावर मुलाखत दिली होती.
आनंदवनातील आनंद त्यांच्या आत्महत्येने आता हरवला गेलाय हे नक्की.
माणूस कितीही मोठा असला पण एकदा का तो मेला की त्याच्या मृतदेहाला बाॅडी म्हटले जाते.बाॅडी आली का? बाॅडी नेली का? बाॅडी जाळली का? अशी नवी भाषा मग सुरू होते.
काहीच कायम राहात नाही हे माहित असूनही माणूस दिवसेंदिवस चूकीचे पाऊल उचलत चालला आहे.हे घातक तर आहेच व विनाशाच्या वाटेवर नेणारे आहे.