( विजय जगताप)
पिंपरी पालिकेत सत्ता असूनही आयुक्त आपल्या डोक्यावर मि-या वाटत असल्याने पाहून भाजपच्या संघटनात्मक पदाधिका-यांनी आपला सारा राग सत्तारूढ पक्षनेते यांच्यावर काढून त्यांच्याकडून अभंगाचे पाठ ( कामकाजाचे धडे)जोरजोरात वदवून घेतल्याची घटना बुधवारी घडली.
भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी पालिकेत सत्ताधा-यांचा कारभार गेल्या पावनेचार वर्षात इतका चर्चेचा झालाय की,एकमेकात भांडणे करणे,उखाळया पाखाळया काढणे, आपल्या पक्षाला खड्डयात लोटण्याचे व बदनाम करण्याचे काम भाजपने इमाने इतबारे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांची त्यांनी आवश्यकताच ठेवली नसून कोणाचाच कोणात आता पायपोस राहिलेला नाही.कारभारी असलेल्या आमदारांनाच न जुमानण्याचे धाडसही भाजपच्या काही नगरसेवकांनी मधल्या काळात केले आहे.
शिस्त, आदेश, निरोप यांचे पालन करायचेच नसते असेही वर्तन त्यांच्याकडून घडले गेले आहे.
महापालिकेच्या राजकारणात प्रशासनावर कंट्रोल ठेवण्याचे व अधिकारी वर्गास सळसळा पळविण्याची ताकद सत्तारूढ पक्षनेते या पदात असते. मात्र काल बुधवारी या पदाचीच वरात त्यांच्याच केबिनमध्ये पक्षाचे पदाधिकारी असलेले राजू दुर्गे व मोरेश्वर शेंडगे यांनी काढली. त्यास निमित्त होते, वाकड येथील सुमारे ५० कोटी रूपये खर्चाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे..! हा प्रभाग आहे राहुल कलाटे यांचा. आणि या कामास विरोध करण्याचे कारण दडले आहे मागील विधानसभा निवडणूकीचे.
स्थायी समितीने हा विषय नामंजूर केल्याने कलाटेंनी मग राज्य शासनाचा हूक लावला आणि आयुक्त हर्डीकर यांना अखेर याविषयी शासनाला उत्तर देणे भाग पडले.
आयुक्तांनी याविषयी शासनाला दिलेला सकारात्मक अहवाल पाहून दुर्गे व शेडगे या जोडीचे पित्त खवळले.”आपली सत्ता असताना आयुक्तांनी या कामाचा सकारात्मक अहवाल दिलाच कसा?” यावरून खेळखंडोबा सुरू झाला आणि त्यात भरडले गेले नामदेवराव..!
आयुक्त चुकीचे की बरोबर हे न पाहता नामदेवरावांवर रेशन निघाले , शब्दाने शब्द वाढत गेला आणि पदाचे ,पक्षाचे पुरते वाभाडे निघाले.संयमी, मितभाषी असलेले असलेल्या नामदेवरावांचाही आवाज चढला. तिघेही आपापल्या भूमिकेचे समर्थन करू लागला.आख्खी चाळ गोळा व्हावी तसं आख्खा तिसरी मजला गोळा झाला.नंतर मात्र नामदेवरावांनी सारवासारव केली व असे काही घडलेच नाही असे म्हटले असले तरी पक्षाची अब्रू चमचाभर गेली काय किंवा हंडाभर गेली काय? गेली ती गेलीच…!