( स्वाती वैद्य )
महाविकास आघाडी सरकार निर्मितीचा इतिहास आता पुस्तक रूपात येत असून लवकरच मुंबईत त्याचे प्रकाशन होत आहे.महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर मागील २५ वर्षात एकाही राजकीय पक्षाला स्वबळावर एकहाती सरकार बनवता आलेलं नाही.सहा वर्षापासून देशाला झपाटून टाकणारी मोदी लाट येऊनही महाराष्ट्रात भाजपला ते शक्य होऊ शकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे.
मात्र २०१९ ची झालेली निवडणूक व त्यानंतरचा सरकार स्थापनेचा प्रवास हा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला आहे. या संदर्भात श्री जगताप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,तीन पक्षांच्या महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशा रंगलेल्या या सामन्यात इतके डाव-प्रतिडाव,खेळया कुरघोड्या,अडथळे,अडचणींची सुरू झालेली मालिका आजपर्यंत कधीच कुठल्या सरकार निर्मितीमध्ये झाल्याची इतिहासात नोंद नाही.म्हणूनच पत्रकार या नात्याने मला महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचा दस्ताऐवज नोंद व्हावा असे वाटले. भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन बनलेल्या या महाविकास आघाडीचा प्रयोग हा नुसता सत्तेसाठी बनला नव्हता तर आत्ताच जर आपण तगलो नाही तर कायमचे वाहून जाण्याची भिती शिवसेना, काॅग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षांना होती.गोष्टीतील कथेप्रमाणे एक लाकूड कोणीही तोडेल, परंतू लाकडांची मोळी बनली तर कोणालाच तोडता येणार नाही हे समूहशक्ती दाखविणारा सिध्दांत या महाविकास आघाडीतील दिसून आला. हा प्रयोग पाच वर्ष टिकेल की नाही हे आज जरी सांगता येत नसलं तरी कोणी एकानं जरी बाहेर पडायचं ठरवलं तरी ते तिघांनाही धोकादायक ठरू शकतं..हे वास्तव तिघेही जाणतात.मात्र मोदींना रोखता येतं,हा मेसेज फार प्रभावीपणे या सरकारच्या स्थापनेतून देशाला दाखवून देण्याचं काम महाराष्ट्राने केले आहे.
हा सारा सत्ता निर्मितीचा थरारक पट शब्दबद्ध केलेले हे नवीन पुस्तक “ सारिपाट महाविकास आघाडीचा” येत्या काही दिवसांतच प्रकाशित होत आहे.