(स्वाती वैद्य )
भारूडकार, प्रवचनकार,प्रबोधनकार अशी संपूर्ण पुणे जिल्हयात ओळख असलेल्या शारदाताई मुंढे यांनी या संकटकाळात आपल्या वाणी, विचार व सामर्थ्याचा उपयोग भयभीत झालेल्या कोरोनाग्रस्तांना समुपदेशन करण्यासाठी सुरू केला आहे.
सावित्रीबाई, जिजाऊ, माता रमाई, अहिल्यादेवी या इतिहासातील कर्तबगार महिलांची महती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी गेली दोन दशके त्या एकपात्री अभिनयातून त्यांचे संदेश, विचार व कार्य पसरविण्याचे काम करतात.परंतू सध्या कोरोनामुळे भयभीत व मानसिक तणावाखाली सर्वच स्तरातील नागरिक असल्याने समुपदेशनाला त्यांनी सुरूवात केली आहे.
ज्यांना कोरोना झालाय, अशी माहिती त्यांना समजते त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना धीर देणे,हा सुरक्षा व सावधानता घेतल्यानंतर लगेच आपल्याला सुखरूप बाहेरही काढतो अशी माहिती त्या फोनवरून देतात.गेल्या पंधरा दिवसात १४१ जणांना त्यांनी मानसिक धक्क्यातून बाहेर काढले आहे.
क्वारंटाईनचे दिवस किती किरकोळ असून त्यापुढे शिवराय,फुले, शाहू ,संभाजी महाराज यांच्या संघर्ष दिवसांची नखभर देखील सर नसल्याचे त्या उदाहरण देऊन सांगतात.