(विजय जगताप)
पिंपरी चिंचवड शहर जगले वाचले तर सोन्याचे रस्ते तयार करा,पण कोरोनासारख्या भयानक संकटात तरी पालिका रूग्णालय हाच आधार असलेल्या सर्वसामान्य जनतेला पोटभर सकस,कॅलरी व प्रोटीनने भरलेले अन्न देण्यासाठी सत्ताधा-यांनी व प्रशासनाने पुढाकार घ्यावा ,असे आवाहन करण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.
१५ हजार रूग्णसंख्येचा टप्पा ओलांडलेल्या पिंपरी चिंचवड शहराने आता तर दररोज हजार रूग्णांचा मीटर टाकण्यास सुरूवात केली आहे . तर दुसरीकडे पालिकेच्या रूग्णालयात व कोविड सेंटरमध्ये जेवण वेळेवर नसणे, पुरेसे नसणे,जेवणात अळया व किडे आढळणे अशा तक्रारी वाढू लागल्याचे चित्र आहे.
वैदयकीय तज्ज्ञांच्या मते कोरोना पाॅझिटिव्ह काळात प्रोटीनयुक्त आहार फार गरजेचा असून प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र दूध, अंडी तर दूर परंतू जे काही जेवण आहे ते तरी नीट मिळावे असा कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा सूर आहे.
सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी काल( शनिवारी)आयुक्तांना याविषयी निवेदन देऊन ,नागरिकांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळणा-या अन्न पुरवठा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.
मास्क घोटाळा, साबण घोटाळा यामध्ये चवली पावली मध्यस्थांनी जरूर खाल्ली असेल परंतू त्याचा इतका गवगवा झाला की आता कोरोना रूग्णांना पाणीही प्रशासन फुंकून देत आहे . एकीकडे सिमेंटचे रस्ते गल्लीबोळात उभारणे, स्मार्ट सिटी करणे, करोडोंचे उड्डाणपूल बांधणे यामध्ये तूफान टेंडर रिंग व गडबड घोटाळे होतात, पाण्यासारखा पैसा तिथे घातला जातो,नगरसेवक पैशासाठी एकमेकांच्या बोकांडी बसतात परंतू जिथे आता खरी जनतेची सेवा करणे गरजेचे आहे तिथे तोलून मापून अन्न दिले जात आहे ( १८० रूपये दिवसाला, त्यामध्ये चहा, नाश्ता, व दोन वेळचे जेवण). आता सत्ताधारी भाजपने जेवणात तरी आचारसंहिता होऊ नये व आपल्या शहरातील नागरिकांची भूकेवाचून तडफड होऊ नये यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.