( विजय जगताप)
आजचा(शनिवार)रेकाॅर्डब्रेक रूग्णसंख्येचा आकडा पाहता संपूर्ण शहरालाच आता कोरोनाने घट्ट मिठी मारल्याचे चित्र असून नागरिक आता भयभीत होऊन धसका घेऊ लागल्याचे दिसून येत आहे.महापालिका प्रशासन युध्दपातळीवर या संकटाला तोंड देत असून मोठया प्रमाणावर डाॅक्टर, नर्स , सोशल वर्कर यांची नितांत गरज शहरात निर्माण झाली असून आयुक्तांनी याविषयी कळकळीचे आवाहन केल्याने त्याची गंभीरता स्पष्ट झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रूग्णसंख्येने १५ हजारांच्या पुढे पाऊल टाकले आहे. आज शनिवार ( २५ जुलै) १ हजार ८९ इतके रूग्ण नोंदले गेले आहे. शहरातील एकही भाग असा नाही की तिथे कोरोनाने प्रवेश केलेला नाही . थेरगाव, पिंपरीगाव, आकुर्डी हा परिसर तर कंटेन्मेंट झोन जाहीर झाला आहे. दाटीवाटीच्या चाळी, सार्वजनिक स्वच्छतागृहांवर अवलंबून असलेल्यांचे जास्त प्रमाण व गल्ली बोळांची सर्वाधिक वस्ती असल्याने या तीन भागांत कोरोनाचा फैलाव जलद व वेगाने होत आहे.
कामगार नगरी अशी ओळख असलेल्या या शहरात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे नोकरी व्यवसायाच्या संकटांबरोबरच आता जगण्याची लढाईही तितक्याच प्रकर्षांने डोके वर काढते आहे. बाहेर पडण्याची भिती, परंतू बाहेर तर पडावेच लागणे यामुळे कुटूंब प्रमुखाबरोबरच घरातील सदस्यही चिंता व काळजीने दिवसेंदिवस तणावात येऊ लागले आहेत. असं एकही कुटूंब व परिचित नाही की त्यांच्या नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तीस कोरोनाने गाठले नाही. अॅम्ब्युलन्सच्या गाडया धावणे, त्यांचे येणारे आवाज यामुळे तर धसका बसणे, भिती वाटणे, या नित्याच्या बाबी वाटू लागल्या आहेत. घरोघरचे हास्य आता मावळले आहे.
आजच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लवकरच शहरात आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड याची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगून शहरातील खासगी डाॅक्टर व नर्स यांना पालिकेच्या मदतीसाठी येण्याचे आवाहन केले आहे.भयभीत झालेल्या नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी सद्यस्थितीत किमान ४० सोशल वर्कर ( msw)यांची निकड आहे. कोरोना होऊन बरे झालेल्यांनी प्लाझमा दान करावे असे आवाहन करूनही बरे झालेल्या १२ हजार रूग्णांनी घाबरून हे दान करण्यास टाळले आहे . त्यांचे मानसिक बळ वाढावे,खासगी वैदयकीय व्यावसायीकांनी पुढे यावे यासाठी समाजातील प्रभावी मंडळींनी ( शिक्षक, वकील, शास्त्रज्ञ,व्यापारी, चार्टर्ड अकाऊंटंट ,उद्योजक ,खेळाडू ,कलावंत, साहित्य, संगीत, कला,शासकीय अधिकारी ,राजकीय
व सामाजिक कार्यकर्ते) यांनी जनतेला आवाहन केले तर संकटात सापडलेल्या शहराला आपल्याला सोडवता येऊ शकेल असे आवाहन बातमी खासच्या वतीने करण्यात येत आहे.