( विजय जगताप)
आज २२ जुलै. महाराष्ट्राच्या राजकारणात टाॅपच्या स्थानावर असलेल्या अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा योगायोगाने आज एकाच दिवशी वाढदिवस आहे.
निसर्गकृपेने त्यांचा जन्म एकाच दिवशी झाला खरा आणि पुढे नियतीनेही त्यांना महाराष्ट्रात एकत्र सत्तेत काम करण्याची संधीही सहा महिन्यांपूर्वी दिली होती परंतू ‘अति घाई संकटात जाई’ या म्हणीप्रमाणे ती फेल गेली,आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारचा जन्म झाला.
फडणवीस हे पन्नाशी पूर्ण करून ५१ व्या वर्षात तर पवार हे एकसष्टी पूर्ण करून ६२ मध्ये पदार्पण करीत आहे. कोरोना संकटकाळात दोघांनी व त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचे वैशिष्टय म्हणजे वयाच्या विशी-पंचविसीतच त्यांनी समाजकारणात पाऊल टाकले . फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिका तर पवार यांनी साखर कारखाना व जिल्हा बँकेतून आपल्या नावाची मोहोर उमटवली. एकाचे बोलणे राकट , रोखठोक तर दुस-याचे मृदु ,मुलायम परंतू प्रशासनावर पकड व वचक मात्र दोघांचाही सारखाच आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या चाणाक्ष नजरेतून फडणवीसांना हेरून प्रदेशाध्यक्ष केले आणि आपल्या वक्तृत्व व अभ्यासू शैलीतून त्यांनी एकाचवेळी सभागृहात व जनतेच्या ह्दयात छाप पाडली. पुढे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे नाव घरोघरी माहिती झाले. अजित पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीचे व पवार या आडनावाचे बाळकडू मिळाले असले तरी आपल्या अंगभूत मेहनतीने शेती, सहकार, कारखानदारी, बॅंकिंग, शिक्षणसंस्था, फार्मा, बायोटेक आणि राजकारण यामध्ये तोलाचे व मोलाचे काम रचून त्यांनी एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे .
येत्या २ आॅगस्ट रोजी या दोघांच्याही राजकीय मुत्सद्दीपणाची झलक चित्रीत केलेली माहिती असलेले “ सारिपाट महाविकास आघाडीचा” हे मी लिहिलेले पुस्तक प्रकाशित होत आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम गो-हे यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना दिली आहे.