( विजय जगताप)
हवा, पाणी, नदी,नाले, प्लॅस्टिक याविषयी सातत्याने आपल्या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांचे विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करणारा, पर्यावरण या एकाच ध्यासाने पछाडलेला विकास पाटील नावाचा योध्दा निसर्गातील मानवप्राण्याला घातक ठरलेल्या विषाणूपासूनच आपल्यातून जावा यासारखी शोकांतिका नाही.
आज त्यांच्या निधनाची बातमी वाचली, आणि धक्काच बसला.महामारीच्या या संकटकाळात सतत सजगपणे दक्ष राहत स्वत:ची काळजी घेणा-यालाच कोरोनाने घेरावे यासारखे दूदैव नाही.
पर्यावरणावर गप्पा झोडणे, प्रदूषणावर चिंता व्यक्त करणे अशी फक्त काठाकाठाने काळजी करणारे या पिंपरी चिंचवड शहरात पायलीचे पन्नास आहेत परंतू सर्वस्व ओतून पर्यावरणासाठी झटणारा व समरस होणारा हा एकमेव इसम होता.
पर्यावरण म्हटलं की विकास पाटील असा आपल्या नावाचा ब्रॅन्ड त्यांनी आपल्या कार्य कतृत्वातून निर्माण केला होता. महापालिका शाळा, खासगी शाळा व येथे शिकणारे महाविदयालयीन युवक अशा काही लाख विद्यार्थ्यांना पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून जोडणे, एकत्र आणणे, संवाद घडविणे, कार्यक्रम करणे असे वर्षभर चालणारे चक्र त्यांनी तयार केले होते. महापालिकेचा स्वतंत्र पर्यावरण विभाग असतो, दरवर्षी शहराला पर्यावरण अहवाल सादर करावा लागतो, याविषयी सतत जागरूक असणारे हे पहारेकरी होते. शहरातून वाहणा-या नद्या या त्या शहराच्या रक्तवाहिन्या असतात , त्या जर बकाल, व गटारगंगा झाल्या तर शहर कितीही स्मार्ट म्हटले तरी त्याला काही अर्थ नसतो.
कोरोनाच्या काळातच एप्रिल महिन्यात त्यांची व माझी भेट झाली.या शहरात पहिल्यांदाच पर्यावरण साहित्य संमेलन त्यांनी नुकतेच भरवून यशस्वी केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. तेव्हा पत्रकारिता क्षेत्रात २० वर्षाहून अधिक काळ असूनही आपले या सूक्ष्म व महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नाही, अभ्यास नाही याची माझी मलाच लाज वाटली.
स्वच्छता या विषयावर आपल्या पालिकेला सातत्याने पिछाडी का मिळते? स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये आपले शहर सलग पाच वर्ष का गटांगळया खाते याचा त्यांनी मला इतका उलगडा करून सांगितला की मी हरखून गेलो. गावगाडयातून अजूनही आपले शहर बाहेर आलेले नाही , नदीवर अंघोळ करणे, गोधडया धुणे, कपडे धुणे या अतिशय साध्या गोष्टी परंतू त्याचे परिणाम किती घातक आहेत हे पहिलीतील विद्यार्थी असल्यासारखे ते मला समजावून सांगत होते. फेसबुक, व व्हाॅटसअपवर ते सतत पर्यावरण हा एकच विषय धरून विविध पोस्ट, व्हिडीओ, फोटो याचा भडिमार करायचे. सारखं तेच तेच म्हणून मी कधी कधी वैतागून जायचो. परंतू त्यांनी आपल्या उपक्रमांत खंड कधी पाडला नाही.
कोरोना लाॅकडाऊन काळात गोरगरिबांना जेवण, अन्नदान करणारे कार्यकर्ते प्लॅस्टिकमधून भात, भाजी देत व त्याचे फोटो सोशल मिडियात टाकत.हे पाहून ते अस्वस्थ होत.प्लॅस्टिक मधून अन्न देऊन हे लोक अजून शहर खराब करणार अशी चिंता करणा-या पोस्ट फेसबुकवर ते लिहायचे.एकदा यावरूनच फेसबुकवरच आमचं वाजलं..”तुमचं पर्यावरण या संकटकाळात बंद ठेवा ?”असे मी त्यांना उत्तर दिलं. मला उत्तर देताना ते म्हणाले, विजय, अरे त्यांची दोन टायमाची भूक भागेल रे ,पण शहर अजून ५० वर्ष मागे पडेल , त्याचं काय? मी तेव्हा निरूत्तर झालो होतो.
त्यांचा स्वभाव, काम करण्याची शैली अनेकांना पसंत नसे, बरेच शत्रू ही त्यांचे झाले होते. पण मी थांबलो तर दुसरा अजून कोणीच नाही रे या विषयात काम करायला ? असे म्हणत ते या कामात स्वत:ला झोकून देत.
चार दिवसांपूर्वी पर्यंत ते ॲक्टीव्ह होते, पंधरा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्व भूमीवर शाडूची मूर्ती कशी चांगली आहे ही पोस्ट दवाखान्यातूनच त्यांनी फेसबुकवर शेअर केली होती.