( विजय जगताप)
शिस्तबध्द पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमध्ये अलिकडे कोणीही ऊठून पक्षाला फाटयावर मारू लागल्याने उद्वीग्न झालेल्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या सरचिटणीसांनी अशा मंडळींसाठी “ याद राखा,गाठ भाजपशी आहे”अशी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात तोळामासा जीव असलेल्या भाजपला २०१७ च्या पालिका निवडणूकीत आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी रातोरात बलाढ्य बनविले,सत्ता आणली आणि इतिहास घडविला.२०१४ नंतर मोदीमय झालेल्या भारतामुळे हा परिणाम घडून आला होता.
परंतू पालिका सत्तेला दिड -दोन वर्ष होत नाही तोच पक्षाविरूध्द जाहीर भूमिका घेणे,पक्षशिस्त न पाळणे,वरिष्ठांचा आदेश कोलणे असे प्रकार सुरू झाल्याने शहर भाजप हा चर्चेचा विषय बनला आहे. ‘ तुमच्यापेक्षा तर आम्ही बरे’…अशी खोचक टिप्पणी आता राष्ट्रवादीवाले देखील भाजपच्या या घरभेदींबद्दल बोलू लागले आहेत.
मध्यंतरी भाजपच्या एका नगरसेविकेने प्रश्न सुटत नाही म्हणून जागरण गोंधळ घातला होता.एकाने मोर्चा काढला आणखी एकाने स्थायीचा अध्यक्ष बनवत नाही म्हणून बंडखोरी करून अर्ज भरला होता, दोन नगरसेवकांनी पक्षशिस्त मोडून विधानसभा लढविली होती, तर आणखी एकाने सध्या आपल्याच पक्षाच्या पालिकेतील सत्तेविरूध्द भ्रष्टाचार मोहिम उघडली आहे.
या वाढत्या असंतोषामुळे मग माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करून शहराचे प्रलंबित विषय राहिल्याची यादी नुकतीच आयुक्तांना दिली.
संधी बघून भाजपमध्ये यायचं,मोठं व्हायचं ,लाभाची पदे मिळवायची आणि नंतर पक्षात राहून भाजपचीच वरात काढायची हे असह्य झाल्याने भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे यांनी आपल्याच पक्षातील या मंडळींना …’आता बास्स’ अशा स्वरूपाचा गंभीर इशारा सोशल मिडियातून दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही पोस्ट शहरात चर्चेचा विषय बनली आहे.
‘बातमी खासने ‘या विषयी दुर्गे यांच्याशी संवाद साधत विचारणा केली असता ते म्हणाले,पक्षाच्या भूमिकेविरूध्द जे वागतात, आपल्या नेत्यांचा अवमान होईल असे कृत्य करतात हे प्रकार आता यापुढे खपवून घेतले जाणार नाही ,आता पाणी पार डोक्यावरून जाऊ लागले आहे. दोन्ही आमदारांच्या मान्यतेने आता यापुढे जे पक्षाविरूध्द गरळ ओकतील त्यांना आम्ही पक्षाच्या वतीने जाहीर जाब विचारणार आहोत, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्यास पक्षशिस्तभंगाच्या कारवाईस तयार रहा असे सांगणार आहोत. काही घरभेदी मंडळी पक्षविरोधी कृत्ये करून “ तो मी नव्हेच” अशा थाटात पक्ष, आपले नेते व त्यांच्या कार्यशैलीवर गुरगुरण्याचे काम करायचे,पत्रकार बांधवांकडे धाव घेऊन मजकूर पेरायचे ,व नंतर पक्षाची बदनामी कशी होईल हा खेळ बघत रहायचे,अशा मंडळींना इशारा देण्यासाठीच सोशल मिडियात ही पोस्ट टाकल्याचे त्यांनी सांगितले.