( विजय जगताप)
खुद्द अमिताभ बच्चन ज्यांचा सल्ला घेतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात असे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले भविष्यकार गिरीश शहा यांनी,अमिताभ व अभिषेक हे कोरोनावर मात करतील व चार-पाच दिवसात घरी जातील ‘अशी माहिती आज बातमी खासशी बोलताना दिली.
काल(शनिवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने अमिताभ हे मुंबईतील नानावटी रूग्णालयात दाखल झाले. गैरसमज, अफवा टाळण्यासाठी अमिताभ बच्चन यांनीच ट्टिटद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळात अभिषेक बच्चन देखील पाॅझिटिव्ह असल्याचे जाहीर झाले.
दरम्यान हे वृत्त वा-यापेक्षाही प्रचंड वेगाने भारतासह जगभरात पसरले व बच्चन कुटुंबियांच्या काळजीत सारे पडले. बाॅलिवुडसह, उद्योग , राजकारण, क्रिडा या क्षेत्रातील मान्यवरांनी ते लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा देण्यास सुरूवात केली.
यासंदर्भात अमिताभ यांच्या कुंडलीचा अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय भविष्यवेत्ते गिरीश शहा यांच्याशी बातमी खासच्या प्रतिनिधीने संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेतली.
१९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांना झालेल्या जीवघेण्या अपघातावेळी गिरीश शहा यांनीच त्यांची पत्रिका पाहून ते बरे होतील असे भविष्य वर्तवले होते. त्यामुळे पुढे शहा व बच्चन कुटुंबियांमध्ये मधुर संबंध निर्माण झाले . बच्चन यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास व शहा यांच्या कुंडलीशास्त्राच्या अभ्यासामुळे ते प्रभावित होते.
शहा म्हणाले, अमिताभ यांची कुंडली मला ज्ञात असल्याने ८० वयाच्या उंबरठयावर असूनही अमिताभ कोरोनावर मात करून सुखरूप घरी येतील. दरम्यान, कोरोनावर कशी काळजी घ्यावी यासाठी भारत सरकारने बनविलेल्या जाहिरातीतील चेहराच (खुद्द अमिताभच)कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने सतर्कता व काळजी किती महत्वाची आहे हे सिध्द झाले आहे.
अमिताभ यांचे वलय पाहता त्यांनी केलेल्या आवाहनानुसार गेल्या दहा दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करण्यासाठी धाव घेतली आहे. सामान्य माणसास तो दहा दिवसात कोणाकोणाच्या संपर्कात आला हे आठवूनही सांगता येत नाही.परंतू अमिताभ नावाची जादूच इतकी मोठी आहे त्यांनी कोणाला न आठवता संपर्कात आलेलेच त्यांना आयुष्यभर लक्षात ठेवतात ही विशेष बाब आहे.