( विजय जगताप)
पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या असमाधानकारक कार्यशैलीचा पंचनामा अखेर खुद्द सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीच गुरूवारी केला.
शहरातील विकासकामांना आलेली दिरंगाई व पालिकेचे नेतृत्व करत असताना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळविण्यात कारभा-यांना आलेले अपयश एकदाचं यानिमित्ताने आता चव्हाटयावर आलं आहे.बदली होणार, होणार? अशा चर्चेमध्ये तीन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी हर्डीकर यांची न झालेली बदली ( बहुधा कोरोनामुळे थांबली असावी)राष्ट्रवादीची सात महिन्यांपासून राज्यात सत्ता असूनही झाली नव्हती. आमदार जगताप यांनी काल आयुक्तांच्या कार्यशैलीची पत्राद्वारे केलेली धुव्वाधार बॅटींग पाहता हा बाँम्ब एक प्रकारे राष्ट्रवादीच्या पथ्यावरच पडला.प्रशासनाचा गाडा हाकताना आयुक्त कमी पडतात व ते निर्णय प्रक्रियेस विलंब लावतात या राष्ट्रवादीच्या मागील तीन वर्षातील आरोपांना सत्ताधा-यांकडूनच आता उत्तर मिळालं आहे.उदया जरी हर्डीकरांची बदली झाली तरी ती राष्ट्रवादीने न करता भाजपलाच ते नको होते यावर एकदाचं शिक्कामोर्तब झालं आहे.
या शहरात २०१७ ला इतिहास घडला,लक्ष्मण जगताप व महेश लांडगे या आमदार जोडीने कमाल करत राष्टवादीला या शहराच्या हद्दपार केलं, राज्यात तेव्हा भाजपचं सरकार होतं,काही दिवसातच हर्डीकर येथे नियुक्त झाले, सत्ताधारी आमदार जोडीच्या कलेने चालत हर्डीकरांनी प्रशासनाचा गाडा हाकण्यास सुरूवात केली खरी मात्र प्रशासनाची वेसण पकडण्यास त्यांना अपयश लाभले. एखादेच तुकाराम मुंढे, श्रीकर परदेशी असतात , सर्वांनाच तसे वागता व काम करता येत नाही हा मानवी स्वभाव आहे हे सिध्द झाले. फौजदारी कारवाई होऊ शकेल अशा प्रकरणात त्यांनी कर्मचा-यांना क्लिन चीट देणं,बनावट सर्टिफिकेट सादर करून प्रमोशन मिळवणा-या कर्मचा-यांना ताकीद देऊन सोडून देणे आणि अधिकारी चुकले तर शंभर- दोनशे रूपयाच्या दंडाची शिक्षा देणं …आदी अशा अनेक घटना सांगता येतील की तिथे प्रशासनाचा दरारा दिसलाच नाही.आयुक्त या पातळीवर फेल गेले तरी नगरसेवकांचा,पदाधिका-यांचा व कारभा-यांचा नेमका इंटरेस्ट कशात आहे? याची पीएचडी पहिल्या वर्षातच मात्र त्यांनी मिळविली.निर्विकार चेहरा ठेवणं व प्रसंग कुठलाही असो कुल राहण्यातच त्यांनी धन्यता मानली व जे आपल्याला पटत नाही त्याला सोयीस्कर विलंब लावणे व ती कामे मागे टाकणे यास त्यांनी प्राधान्य दिलं आणि नेमकं तेच वागणं सत्ताधा-यांना खुपलं.आणि आमदार जगताप यांच्या २६ प्रश्नांना उत्तर द्यायची पाळी त्यांच्यावर आली .ज्येष्ठ आमदार असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या कार्यपध्दतीची एक विशिष्ट स्टाईल आहे, जिल्हयाच्या कलेक्टरपासून पालिकेच्या आयुक्तांना सरळ करण्यात मागील पंधरा वर्षाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे पण पाणी पार डोक्यावरून जाऊ लागल्याने त्यांना लेटर बाॅम्ब टाकावा लागला. “ब” दर्जाची असलेली ही पालिका शंभर टक्के वेग पकडूच शकत नाही अशी येथे रचना आहे. अजूनही गावखाती कारभार, भौगोलिक अडचणी, पायाभूत अडथळे( पाणी पुरवठा, अनधिकृत बांधकाम) यांना सांभाळून विस्ताराने प्रचंड वाढलेल्या शहराचा कारभार हाकणं वाटतं तेवढं सोप्पं नाही. आमदारांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांमध्ये तथ्य जरूर असेल परंतू ते समाधानकारक त्यांना पटवून देण्यात आयुक्तांना अपयश आलंय हे नक्की..! राहिली गोष्ट कोरोनाची…! आयुक्त काय किंवा अनिल राॅय काय , कोणीच ही महामारी वेगात रोखू शकत नाही हे जागतिक सत्य आहे. १३ एप्रिललाच हर्डीकर म्हणाले होते की , आपल्याला आता कोरोनाबरोबरच रहायचं आहे, जून, जुलै हे फार रूग्ण संख्येचे असणार आहे”. हा त्यांचा स्टडी योग्य होता. चिकन गुणिया व डेंग्यू हाताळला म्हणून राॅय सारखे अधिकारी कोरोना कंट्रोल मध्ये आणतील हा आमदारांचा दावा हास्यास्पदच आहे.जिथे जगाने कोरोनापुढे गुडघे टेकलं तेथे राॅय काय कमाल करणार? असो.
आता गरज आहे प्रशासन व सत्ताधा-यांनी एकत्रितपणे मार्ग काढण्याची..! दोघांनीही हातात हात घेऊन काम करत नागरिकांना पालिका सक्षम आहे, खंबीर आहे , असा विश्वास देण्याची..! आयुक्त चुकले की नाही हे सगळेच सांगतील परंतू सत्ताधा-यांनी तीन वर्षात कसा त्रास दिला हे प्रशासन सांगू शकत नाही हे दूर्दैव आहे.