(विजय जगताप)
निसर्गाचं मुक्तहस्ते वरदान लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या पर्यटनाला कोरोनामुळे यंदाच्या वर्षी ब्रेक लागला अाहे. हिल स्टेशन म्हणून भारत सरकारच्या नकाशावर नोंद होऊन ७० वर्ष झालेल्या लोणावळा-खंडाळयाला डोळे भरून पाहता व अनुभवता न येण्याची हि इतिहासातील पहिलीच घटना असणार आहे.
सह्याद्रीची विशाल पर्वतरांग व त्याच्या पोटात असलेल्या लेण्या ,गड ,किल्ले व डोळयाचं पारणं फेडणारा निसर्ग हे पुणे जिल्हयातील मावळ तालुक्याचं वैशिष्टय ..!
भोर-वेल्हा, मुळशी, जुन्नर येथेही निसर्गाची उधळण असली तरी मावळ तालुक्यापुढे सारे फिके पडतात.
वास्तविक मावळपेक्षा जास्त लेण्या व निर्सगाचं लेणं जुन्नरला लाभलं असलं तरी लोणावळा व खंडाळयामुळे मावळला आलेली नजाकत व खुबसुरतीचा नजारा काही औरच आहे.
१८६० मध्ये वाफेवर चालणा-या रेल्वे इंजिनमध्ये पाणी भरण्याची सोय व्हावी यासाठी इंग्रजांनी लोणावळा येथे भुशी धरण बांधलं व पुढे १९४५ मध्ये नेव्ही दलाचं प्रशिक्षण केंद्र असलेली आयएनएस शिवाजी अकादमी येथे सुरू झाली आणि मावळचं भाग्यच बदललं..पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही फिरणं व एन्जाॅय करणे ही भारतीय जीवनशैलीला सवयच नव्हती . निसर्ग अनुभवयाचा असतो हा प्रकारच कोणाच्या गावी नव्हता .मात्र चित्रपट क्षेत्राने १९५० च्या दशकात पकडलेला वेग व घातलेली मोहिनी यामुळे लोकं स्वप्नरंजनात जाण्याचं युग सुरू झालं. शुटींगसाठी चांगला स्पाॅट म्हणून लोणावळा खंडाळा ‘लयं भारी आहे ‘हे राज कपूरच्या लक्षात आलं आणि या भागाचं भाग्यच बदललं.आणि मग पिक्चर पाहून “अरे ,हे तर आपल्या इथलं” असा साक्षात्कार लोकांना झाला. पुण्याहून मुंबईला जाताना लागणारा खंडाळा व तेथे दिसणारा बोगदा व द-या खो-या हा कुतूहलाचा विषय झाला आणि फिरणं हा प्रकार सुरू झाला. १९६० च्या दशकात राजा गोसावींनी “ हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट.. हे गीतच खंडाळयावर गायलं आणि लोणावळा खंडाळा रातोरात फेमस झालं. पुढे मळवली, पवना धरण ते अलिकडच्या काही वर्षात आंदर मावळ व नाणे मावळ यांनी या तालुक्याला चार चाॅद लावले.
गेली ७० वर्षे बाराही महिने लोणावळा खंडाळा व पावसाळयातील चार महिने उर्वरित मावळ हिंडणं फिरणं हा रिवाजच बनला होता.यंदा कोरोनाने तालुक्यातील ३१ स्पाॅटवर पर्यटनास बंदी घातली आहे. केवळ पर्यटनातून जवळपास २०० करोडची होणारी उलाढाल यंदा थांबली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती थांबणं आवश्यकही आहे. त्यामुळं “ सीर सलामत तो पगडी पचास” या म्हणी प्रमाणे जीव वाचला तर बोकाळण्यासाठी पुढं आयुष्य आहेच की…!