(अरूण बो-हाडे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कोरोनाची लागण झाल्यामुळे दत्ता साने यांचे नुकतेच निधन झाले, या पार्श्वभूमीवर साहेबांनी ही भेट घेतली. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. महानगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा ते प्रतिनिधीत्व करीत होते. सुमारे बावीस वर्षांपूर्वी महापालिकेतून गांवे वगळावीत म्हणून केलेल्या आंदोलनातून पुढे आलेले हे युवानेतृत्व दिवसेंदिवस बहरत गेले आणि लोकांच्या मनामनांत जावून रुजले. एक झुंजार, लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा रुजलेली होती. अशा कार्यकर्त्याच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटूंबाची हानी तर झालीच, त्याचबरोबर पक्षाचेही नुकसान झाले. त्यांच्या निधनाने चिखली परिसरातील सामान्य माणसाचा आधार गेला.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या दत्ता साने यांनी स्वकर्तृत्वावर सामाजिक व राजकीय जीवनात स्वतःचे स्थान निर्माण केले. राजकीय पडझडीतही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अशा धडाडीच्या कार्यकर्त्याचे जाणे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेले. म्हणूनच शरद पवार साहेब आवर्जून सांत्वन करण्यासाठी चिखलीत त्यांच्या घरी आले.
खेड्यापाड्यातील, शहरातील अथवा झोपडीतही राहणाऱ्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारा नेता, त्यांची काळजी घेणारा नेता आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता.. अशी शरद पवार साहेबांची ख्याती आहे. मात्र त्यांच्या सध्याच्या वयाचा विचार करता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सद्यःस्थितीतील कोरोनाच्या साथीचा वाढता प्रभाव लक्षात घेता, या नेत्याची आजची पिंपरी -चिंचवडची भेट विलक्षण महत्त्वाची ठरते.
एखादा आजी माजी आमदार किंवा खासदार अथवा त्या ताकदीचा मोठा नेता यांच्या घरी एखाद्या नेत्यांनी जाणे, भेट देणे हे आपण समजू शकतो. परंतु आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्या पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या सामान्य, पण निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ आणि प्रोत्साहन देतानाच त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारा शरद पवारांसारखा नेता विरळाच असतो. शरद पवार साहेबांना “जाणता राजा” का म्हणतात, याचा काहीजणांना प्रश्न पडतो. मला वाटते त्याचे उत्तर त्यांच्या या सवयीमध्ये आहे. दुःखद प्रसंगी त्या कार्यकर्त्याला भेटून किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटूंबियांना भेटून विचारपूस करणे, घटनेची माहिती घेणे, त्यांना धीर देणे आणि त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करणे ही वर्षानुवर्षे जपलेली त्यांची सहजप्रवृत्ती आहे. यामध्ये कुठलाही कृत्रिमपणा नसतो अथवा “इव्हेंटबाजी” नसते. उलट ओतप्रोत भरलेली माणूसकी आणि प्रेम दाटलेले असते. कधीकधी इच्छा असूनही एखाद्या वेळी कामाच्या व्यापात कुठे नाहीच जाता आले, तर किमान फोनवरून कार्यकर्त्याशी बोलून त्याचे दुःख हलके करण्याचा साहेब प्रयत्न करतात.
पिंपरी चिंचवड मधील भेटीमध्ये ते भोसरीतील जुन्या पिढीतील एक कारभारी, पैलवान विठोबा लांडे यांच्याही कुटूंबियांना भेटायला गेले. विठोबा लांडे हे १९७८ मध्ये तेव्हाच्या नगरपालिकेचे नगरसेवक होते. त्याहीपेक्षा शरद पवार साहेबांवर त्यांची अतोनात श्रद्धा होती. वारकरी सांप्रदायाच्या उत्कर्षासाठी त्यांचे भरीव योगदान आहे. वयाची शंभरी ओलांडून त्यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. माजी आमदार विलासराव लांडे यांचे ते पिता, त्यांच्याही घरी जावून साहेबांनी कुटूंबियांचे सांत्वन केले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना प्रेम देण्याची, कार्यकर्त्याला उभारी देण्याची साहेबांची ही धारणा अतुलनीय आहे. राजकारणासाठी नव्हे, तर सामाजिक भावनेतून साहेब वागत असतात, कृतीतून व्यक्त होत असतात.
एवढेच नव्हे तर, एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवली किंवा दुष्काळ, भूकंप अशा प्रसंगी, त्या संकटसमयी त्या परिसरातील नागरिकांना समक्ष भेटून, घटनेची खोलवर माहिती घेऊन प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना ते देतात. सत्ता असो वा नसो, महाराष्ट्रातील जनतेच्या काळजीपोटी वयाचा अथवा वातावरणाचा विचार न करता साहेबांच्या भेटीगाठी आणि दौरे सुरू असतात, हे सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या सर्वांना माहिती आहे.
मागिल वर्षी सांगली, कोल्हापूर परिसरातील महापूरामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तेव्हा कुठलाही विचार न करता हा जनतेचा नेता शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी धावून जातो, तेव्हा मी- मी