कष्टकरी, वंचितांच्या वेदना आपल्या गायनातून व पोवाडयातून मांडत समाज प्रबोधनाचे काम करताना त्यांनी कोरोना काळातील मजूरांचं जगणं गाण्यातून मांडलं आणि बघता बघता या गाण्यानेच भाकरीचा प्रश्न सोडवल्याची घटना आज दिसून आली.
गावातील माणूसकीच्या मातीचा गंध शहरी भागात भाकरीच्या रुपाने दरवळण्याची किमया चिंचवड येथील लोकशाहीर कलावंत आसाराम कसबे यांच्या गायनातून घडली आहे.
कसं जगावं गरीबानं।कुठं मिळलं भाकर या आर्त प्रश्नाच्या टाहोला प्रत्यक्ष मदतीचा हात दिला तो शिरूर तालुक्यातील कोळगाववासांनी…! नाव्हरा कोळगांव येथील ग्रामस्थ व समस्त जगताप परिवार यांनी 300 किलो ज्वारीचे संकलन करुन पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगार झालेल्या मोलमजूर कामगार बांधवांसाठी पाठवली असून ” आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही अाहात तिथेच सुखरुप रहा. सरकारी आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. सर्व काही ठिक होईल असा अात्मियतेचा सल्ला व धीर ही दिला.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणार्या मोलमजुरांच्या कुटुंबांची होत असलेली अाबाळ ” कसं जगावं गरीबानं कुठं मिळलं भाकर…” अशा काळजाला हात घालणार्या गीतामध्ये लोककलावंत शाहीर आसाराम कसबे यांनी मांडली होती.वास्तव परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारा हा आॅडीओ काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. हाच ऑडिओ ऐकून माणुसकीचा ओलावा टिकवून ठेवलेल्या शिरुर तालुक्यातील नाव्हरा कोळगावचे पोलिस पाटिल उद्धव जगताप, भानुदास जगताप, कल्याण जगताप, महेश जगताप,निखिल जगताप, दिनेश जगताप व नटराज जगताप यांनी 300 किलो ज्वारीचे संकलन करुन लोकप्रबोधिनी कलामंच समाज सेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत ती गरजूंपर्यंत पोहचवून माणूसकीचे दर्शन घडविल्याने मजूर कामगार समाधान व्यक्त करीत आहेत.
या सकारात्मक घटनेमुळे लेखणीची ताकद अजूनही क्रांती घडवू शकते याचा प्रत्यय आला.