(विजय जगताप)
नागरी हिताच्या प्रश्नांवरून आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमधील मतभेद मिटत नसतील तर ते मुद्दयावरून गुद्दयावर कसे येतात याचा तमाशा नुकताच शहरवासियांनी पाहिला.
या हाणामारीच्या घटनेमागचे नेमके कारण व सांगितलेले गेलेले कारण यामधील खरं कुठलं?हे सुज्ञास सांगणे न लागे अशा प्रकारातलं आहे. असो, वाद कुठल्याही मुद्दयावर का होईना पण शहराची पुरती अब्रु यानिमित्ताने निघाली.
स्थायी समिती अध्यक्षपद हे इतकं ताकदवर पद आहे की त्या खुर्चीवर जो बसतो त्याला आकाश दोन बोटं ठेंगणं वाटलंच म्हणून समजा..! सुमारे पाच हजार कोटी बजेट असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीचा वर्षभरापुरता मालक होण्याचा मान या पदावरील व्यक्तीस मिळतो.त्याचबरोबर लाख आणि कोटीत दिसणारी कॅश दर आठवडयालाच येथे मिळत असल्याने या पदाची नशा व धुंदी जगातील कुठल्याच नशेला नसते हे देखील वास्तव आहे.
ठार अडाणी आणि मुका पण एकवेळ बोलेल पण वाचा असूनही अबोल असणा-या काही महाभागांनी ओ की ठो कळत नसताना देखील या खुर्चीवर बसून मागील ३४ वर्षात आयुक्तांना अंदाजपत्रक सादर केलंय हा पण इतिहास आहे. अलिकडेच यापदावर आलेल्या मान्यवरांना दिवसाचे चोवीस तास देखील या पदाच्या कामकाजासाठी कमी पडायचे. नशीब ..आंघोळीला तरी ते घरी जात. २०१७ ला भाजपची सत्ता मोठया मेहनतीने दोन आमदारांनी खेचून आणत शहरात इतिहास घडविला. साक्षात शरद पवार ,अजित पवार यांना कात्रजचा घाट दाखविण्याची किमया या आमदार जोडीने केली.
निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना स्थायी समितीत काम करायला( मनी) मिळावं अशा शुध्द हेतूने त्यांनी पाच वर्षाचे रोटेशन आखलं, पद वाटपाची सायकल आखली पण मार्च २०१९ ला स्थानिक कारभा-यांना व त्यांच्या शिफारशीला डावलून एकाने स्थायी अध्यक्षपद खेचून आणलं. त्यांच्यामुळे पद वाटपाचे चक्रच बिघडले. आणि विषमता निर्माण झाली. पद मिळाल्यानंतर सर्वांना येणारी धुंदी त्यांनाही आली व ती इतकी त्यांच्यामध्ये भिनली की या शहराचा पोलिटिकल बाजच ते विसरले. आणि परवाचा हाणामारीचा प्रसंग भर पालिकेत घडला.
या शहरात जेव्हा भाजप नर्सरीत शिकत होती तेव्हा अंकुश लांडगे यांची हत्या व सांगवीतील शितोळे नामक एका कार्यकर्त्यांचे हात तोडण्यापर्यंतच्या घटना घडल्या होत्या तेव्हाचा क्षीण भाजपही गुंडगिरीला विरोध करत प्रचंड बलशाही ठरला होता.तोच भाजप आज शहरात बाहुबली इतका ताकदवान असूनही केवळ आर्थिक किनार या प्रकरणाला असल्याने खुडुक कोंबडीसारखा झाला. मारामारीत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांबद्दल व त्या दोन नगरसेवकांबद्दल तर न बोललेच बरे, वर म्हटल्याप्रमाणे ‘सब घोडे बारा टक्के ‘असे सगळेच एका माळेचे मनी आहेत.
दृष्ट लागेल इतकं वाढलेलं व विकास झालेलं हे शहर आज पुण्याच्या तोडीस तोड ठरले आहे . शहर स्थापना होऊन यंदा आपण सुवर्ण महोत्सवी वर्षात आलो आहोत तरी भिवंडी व औरंगाबाद महापालिकेत होणा-या राडयासारखी आपण ही भांडत असू तर काय बाकी ठेवली या तिघांनी शहराची..!
तीनही पक्षांनी आता तरी बोध घ्यावा नाही तर उदया मुडदे पाडतील सगळे एकमेकांचे , असंच खेदाने म्हणावं लागतंय…!