( विजय जगताप)
शहरातील पहिली अधिकृत झोपडपट्टी असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आनंद नगरमध्ये कोरोनाने घातलेले तांडव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने आता युध्दपातळीवर सूत्रे हलवली अाहेत.
अस्वच्छता, श्वास गुदमरेल अशी दाटीवाटीने बांधलेली घरे,संडास व मूत्रविसर्जनासाठी ७ हजार नागरिक पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा करत असलेला वापर आणि सोशल डिस्टींक्शन राखताच येऊ शकणार नाही अशा स्थितीमुळे निर्माण झालेल्या व्यवस्थेचे येथे उडालेले तीन तेरा यामुळे आनंदनगर परिसर गेल्या दहा दिवसात पालिकेच्या हाताबाहेर गेला.
तीन दिवसांपूर्वी येथे अधिक फैलाव होऊ नये म्हणून पालिकेने येथील काही कुटूंबातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी प्राधिकरणातील एका परिसराची निवड केली मात्र उच्चभ्रू मंडळींनी त्यास विरोध करून आपल्या नगरसेवकांना नाईट डयूटीला जुंपून रस्त्यावर खडा पहारा लावला.यानिमित्ताने शहराचा अमानवीय चेहरा, सामाजिक बहिष्कार व विषमतेची छाया उमटलेली दिसून आली.मग सैरभैर झालेल्या व खचलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी आता येथे राहणा-या तरूणांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या लोकांचे मनोबल उंचावण्याची मोहिम हाती घेतली आहे.जी परिस्थिती मुंबईतील धारावीची आहे अगदी तसेच राहणीमान व जीवनपध्दती आनंदनगर भागातील लोकांची आहे.सद्यस्थितीत पालिकेने सर्वेक्षण व तपासणी पथके अधिक संख्येने पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य दिले आहे. १३ मे ला पहिला कोरोना रूग्ण येथे आढळला. त्यानंतर दररोज रूग्ण मिळू लागल्यावर १८ मे ला हा परिसर सील करण्यात आला.आणि आज ( सोमवार) तर १२० इतकी रूग्ण संख्या एकटया आनंदनगरची झाल्याने शहरातील हा एक नंबरचा हाॅटस्पाॅट बनला आहे.
आनं उसदनगरची पार्श्वभूमी व वस्तुस्थिती
नगरपालिका काळात सोलापूर, कर्नाटक या भागातून मजूर असलेली अनेक कुटूंबे पोटापाण्यासाठी या शहरात आली.१९७८ साली तत्कालीन नगरसेवक अनंत गावडे या दानशूर व्यक्तीने चिंचवड स्टेशन येथील आपली जागा या मजूर कुटूंबांना झोपड्या उभारण्यासाठी दिली.कृतज्ञता म्हणून या मंडळींनी अनंतनगर असे नाव परिसराला दिले.अलिकडच्या काही वर्षापर्यंत अनंतनगरच या परिसराला म्हटले जात होते.पुढे त्याचे आनंदनगर असे नाव झाले.पालिकेने २००२ च्या झोपडपट्टी सर्वेक्षणात १०२८ झोपड्या ( घरे) असल्याची नोंद आहे . पुढे अठरा वर्षात कुटूंबे वाढल्याने त्यामध्ये तीनपटीने वाढ झाली.आजमितीस अडीच हजारच्या पुढे इथे घरे आहेत.
दक्षिणेला मुंबई-पुणे महामार्ग तर उत्तरेला रेल्वे मार्ग अशा बेचक्यात आनंदनगरमधील जनता येथे दाटीवाटीत राहते आहे.येथील ९५ टक्के नागरिक संडास व मूत्रविसर्जनासाठी पालिकेच्या शौचालयाचा वापर करतात.गल्ली आणि बोळा इतक्या अरूंद आहेत की दारात बसून पाय पसरले तरी थेट समोरच्याच्या घरात पाय जातील अशी परिस्थिती..! ड्रेनेजची बोंब, उघडी गटारे व घराघरातील मो-यांमधून निघणारे सांडपाणी थेट जाण्याची सोय नाही अशी या भागाची कहाणी आहे.येथे राहणारे लोकप्रबोधिनी कलामंचचे अध्यक्ष आसाराम कसबे हे आपल्या सहका-यांच्या मदतीने लोकांना धीर देण्याचे व मनोबल वाढविण्याचे काम करीत आहे.आरोग्य संरक्षण व सुरक्षा पालिका देत असली तरी मानसिक बळ व आधार देण्यासाठी अनेक हातांची आता येथे खरी गरज आहे.