( विजय जगताप)
ट्रोलमुळे आधीच अडचणीत आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अवस्था थोडी कुठं सावरत नाही तोच शाहू महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या ट्विटवरून काल पुन्हा ते ट्रेालधारकांच्या रडारवर आयते सापडले.
शाहू महाराज प्रकरणावर केलेल्या ट्विट बद्दल काहीच प्रतिक्रिया न देता त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी चुप्पी साधली होती मात्र चहुबाजुंनी टिकेचे निखारे पेटल्यानंतर तब्बल २४ तासांनंतर त्यांनी माफी मागितली. वास्तविक ही चूक शंभर टक्के त्यांचे सोशल मिडिया सांभाळणा-या टीमकडून झाली असली तरी दुष्काळात तेरावा महिना अशी त्यांची गत झाली.त्यामुळे सद्यस्थितीत बहुजनांची मोठी संख्या असलेल्या भाजपमध्ये त्यांच्याबद्दलची नाराजी मात्र लपून राहू शकलेली नाही.फडणवीस यांना कव्हर करण्यासाठी त्यामुळे पाचच दिवसांपूर्वी मुंबई व नागपूर पोलिसांकडे भाजप नेत्यांनी ट्रोल संदर्भात केलेल्या तक्रारींवर यामुळे वरवंटा फिरला गेला आहे.
का होत आहेत फडणवीस एवढे टार्गेट? का घेतले जात नाही त्यांना गंभीर? याचा शोध घेता आपल्याला थोडे भूतकाळात डोकवावे लागेल.
अभ्यासपूर्ण भाषाचातुर्य व संवादशैली हि खरं तर फडणवीस यांची खास वैशिष्टये…!
गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले नसते तर कदाचित सीएमपदी त्यांचा नंबरही लागला नसता..! त्यांचे वय व राजकीय उंची पाहता त्यांना तशी फार मोठी संधी या पदातून लवकर लाभली. परंतू परिपक्व व ज्येष्ठ राजकारणी म्हणून जी प्रतिमा नितीन गडकरी यांची निर्माण झाली होती त्या तुलनेत ते सीएम असूनही छोटेच भासत राहिले.
एकनाथ खडसे जमीन व्यवहारात फसल्याने त्यांना स्पर्धक तसे कोणी राहिलेच नव्हते. पंकजा मुंडे, विनोद तावडे, मुनगुंटीवार यांना त्यांनी नियंत्रण रेषेच्या बाहेर डोकावू दिले नाही. त्यामुळे त्यांचा बोन्साय आपोआप झाला. पाच वर्ष स्वत:कडेच गृहखाते ठेऊन त्यांनी विरोधात जाणारे स्वपक्षीय असो की विरोधी पक्षातले प्रत्येकाची त्यांनी पध्दतशीर बोलती बंद करून ठेवली होती.
पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात यायचे तेव्हा तेव्हा फडणवीस आपल्या भाषणात “भारत माता की जय “हा पुकारा अशा काही टेचात द्यायचे की ही आरोळी म्हणावी का आक्रमण ? असा प्रश्न पडे. त्यांची देहबोली व आवेशपूर्ण भाषण अपील न ठरता कर्णकर्कश कानठळया बसणारे कृत्रिम भासायचे.महाराष्टाच्या राजकीय संस्कृतीत आजपर्यंतच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने सार्वजनिक सहभाग घेतला नव्हता जो फडणवीस यांच्या काळात प्रकर्षांने दिसून आला.
आणि कळस तर तेव्हा झाला जेव्हा प्रचारसभेत “ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” या त्यांच्या प्रखर आत्मविश्वासाने भरलेल्या वाक्याची सोशल मिडियात अक्षरश: पारायणे झाली तेव्हा..!
फडणवीस यांच्या बद्दलची गंभीरता तेथेच संपली. टिकटाॅक या लोकप्रिय प्लॅटफाॅर्मवर तर फडणवीस यांच्या या वाक्यावरून लोकांनी एवढे विनोद केले की त्याला सीमा नाही.”अरे ओ सांबा… हा डायलाॅग ५० वर्ष झाली तरी गब्बरची पाठ सोडायला तयार नाही तसे हे वाक्य फडणवीस यांचे ट्रेडमार्कच बनले. युती टिकवतानाचा जो चाणाक्षपणा प्रमोद महाजनांमध्ये होता तो चतकोर गुण जरी घेऊन ते अहंपणा सोडून ‘ठाकरे तुम्ही फोन उचलत नाही तर मीच डायरेक्ट घरी आलोय, ‘अशी धूर्तता त्यावेळेस दाखवून त्यांनी ठाकरे यांची बोलती बंद करणे अपेक्षित होते.परंतू तो रंधा त्यांना मारताच आला नाही.अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार बनविण्याच्या प्रयत्नातही ते फेल ठरल्याने ते अजूनच निशाण्यावर आले.
२०१४ ते २०१९ या त्यांच्या उभरत्या काळात जेव्हा सोनिया, राहुल, पवार यांच्यावर कंबरेखालची टिका सोशल मिडियात व्हायची तेव्हा समंजस राजकारणी म्हणून फडणवीस पुढे येऊन समजा म्हणाले असते की, त्यांचे कार्य , अभ्यास व उंची लक्षात घ्या , फालतू टिका मी खपवून घेणार नाही ‘ तर फडणवीस यांची इमेज अजून वाढली असती.
परंतू आता जे पेरले तेच उगवल्याने त्यांची अवस्था चकरव्हूात फसलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे.