( विजय जगताप)
असे म्हटले जाते की, बाबासाहेब हे जगातील एकमेव असे महामानव आहेत की त्यांच्या जयंतीच्या आड साक्षात चंद्र, सूर्य जरी आडवे आले तरी त्यांना टक्कर देण्याची हिंमत व जिगर त्यांच्यावर प्रेम करणा-या करोडो अनुयायींमध्ये अाहे.परंतू आज केवळ भारतच नाही तर जगावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे या मुक्तीदात्याची शिकवण असलेल्या ‘सर्वांना अंधारातून उजेडाकडे ‘नेण्याच्या महामंत्राचा अवलंब करीत शासनाला सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येकाने स्विकारली आहे.
बाबासाहेब म्हणजे ऊर्जा, बाबासाहेब म्हणजे अंगार व एक अशी सळसळती आग की प्रत्येकाच्या ह्दयात त्यांना बापाचे स्थान आहे. परंतू यंदाचा १४ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस इतिहासात प्रथमच प्रत्येक जण आपापल्या घरात साजरा करणार आहे . त्यास कारणही तितकेच गंभीर आहे.जगावर ओढवलेल्या महाभयंकर अशा कोरोनाच्या संकटाचे आहे. नेमका हा रोग देखील असा आहे की ,त्याचे निवारण करायचे म्हणजे सर्वप्रथम लोकांनी एकत्र समूहाने यायचेच नाही, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवायचे. आणि या उलट नेमके बाबासाहेबांची जयंती म्हणजे समूहाला आलेले प्रचंड उधाण असते.
जगातील १०० हून अधिक देशात भीमजयंती मोठया जल्लोषात व उत्साहात साजरी केली जाते.१४ एप्रिल हा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात या दिवशी एक तेजस्वी सकाळ उगवते. उत्साह, आनंद असलेला हा एक प्रमुख सण व उत्सव आहे.सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक स्वरूप असलेला हा सण असल्याने भारत सरकारने या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिलेली असते. या दिवशी गोडधोड जेवण, नवीन कपडे याचबरोबर सांस्कृतिक अशा नृत्य व गायनाच्या मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करून जिकडे तिकडे आनंदोत्सव साजरा होतो. यामध्ये फक्त आंबेडकरी समाजच नाही तर इतरही दलितेतर वर्ग सहभागी होतो.
आपणास माहिती असेलच बहुधा की जगात पहिल्यांदा आंबेडकर जयंती १९२८ साली बाबासाहेब हयात असतानाच पुण्यातील जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी सुरू केली. बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीवरील अंबारीत ठेऊन,त्याचबरोबर ऊंट आणत भव्य रथातून ही मिरवणूक झाली होती .
गुगलने तर बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीला आपल्या डुडलवर बाबासाहेबांचे आकर्षक चित्र ठेवले होते व जगातील अब्जावधी लोकांनी हे पाहून महामानवाला आदरांजली वाहण्याच्या या अनोख्या प्रकाराचे स्वागत केले होते.
परंतू यंदा मात्र १४ तारखेला जयंती सार्वजनिक स्वरूपात होणार नसली तरी घरोघरी मात्र तेवढ्याच कौटुंबिक आनंदात साजरी होणारच आहे. कोरोना संपल्यानंतर मात्र ती तितक्याच जल्लोषात व धुमधडाक्यात होणार हे नक्की…!