(श्रीकांत चौगुले)
कोरोनामुळे समाज जीवन ठप्प झाले आहे. समाजाचे एक अंग असलेले सांस्कृतिक क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. नाटक, चित्रपट, संमेलन,प्रदर्शने सर्व काही बंद आहे.अशा काळात घरातच सर्वजण चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत.त्यामुळे घरेच आता सांस्कृतिक केंद्रे बनली आहेत.
कोरोनामुळे सर्वप्रथम पहिल्यांदा १४ मार्चला शाळा बंद झाल्या त्यानंतर क्रमाने नाट्यगृहे,थिएटर, माॅल्स बंद झाले.कार्यक्रमांना बंदी आली. वृत्तपत्रातील नाटक, सिनेमाच्या जाहिरातीचे, कार्यक्रमांचे पानच नाहिसे झाले.आता तर वृत्तपत्रेही बंद झाली आहेत. लोकांना आता केवळ सोशल मिडियाचा, त्यावर आदळणा-या मेसेजचा त्याचबरोबर विविध मनोरंजनाच्या लिंक पाहण्याचा व फाॅरवर्ड करण्याचा उरला आहे.
बाहेरचे सांस्कृतिक जग ठप्प असले तरी लोकांनी घरातच सिनेमा, नाटकाचा आनंद घेणे सुरू ठेवले आहे. आवडत्या मैफिली ऐकणे, आवडत्या लेखकाची पुस्तके वाचणे अशा दैनंदिन कार्यक्रमामुळे घरच सांस्कृतिक केंद्र बनले आहे.पु.ल.देशपांडे, द.मा.मिरासदार, वपु, शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या पुस्तकांच्या पीडीएफ फाईलच्या लिंक फिरत आहेत.त्याचबरोबर गाजलेली नाटके त्यामध्ये ‘तो मी नव्हेच, वस्त्रहरण , आदी नाटके युट्यूबवर लोक पहात आहेत.सास्कृतिक क्षेत्रातील काही मंडळींनी घरातच बंदिस्त जागेत कार्यक्रम करून त्याचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्याचा फंडा सुरू केला आहे.त्यामुळे घरातच कार्यक्रमाचा आनंद घेणे सुरू झाले आहे.एरव्ही टिव्ही पाहण्यास बिल्कुल सवड नसलेली मंडळी तासनतास टिव्हीतून डोके बाहेर काढत नसल्याचे चित्र आहे. दुपारची सोय आयुष्यात कधी न घेतलेली मंडळी सांस्कृतिक कार्यक्रम पाहता पाहता वामकुक्षी व डुलकीचा आनंद घेत आहेत.