सुमारे 25 लाख लोकांचा खऱ्या अर्थाने पालक असल्याची भावना निर्माण करून देणारं सर्वोच्च पद म्हणजे महापौरपद…! पिंपरी-चिंचवडचे २५ वे महापौर असलेले राहुल जाधव यांची आतापर्यंतची १७५ दिवसांची कारकिर्द खऱ्या अर्थाने इतर सर्व महापौरांपेक्षा आता वेगळी व सरस ठरू लागली आहे.
उर्वरित २४५ दिवसात आता नागरी हिताचे किती प्रश्न ते कशा कुशलतेने सोडवतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ ऑगस्ट २०१८ ला राहुल जाधव यांनी भाजपचे दुसरे महापौर म्हणून पदाची सूत्रे स्विकारली. उमेदीच्या काळात रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणारे राहुल जाधव हे सर्वसामान्य व पाय जमिनीवर असलेल्या व्यक्तिमत्वाची शहराला यानिमित्ताने प्रचिती आली. मूळ ओबीसी असलेले श्री जाधव यांचा कणखरबाणा पद स्विकारल्याच्या पहिल्या दिवशीच सर्वांना दिसून आला. ज्याला गुरू मानतो त्याच्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या त्यांच्या जाहीर भूमिकेचे कौतुकही झाले. वक्तृत्व, शिक्षण आणि प्रदिर्घ राजकीय अनुभव या त्यांच्या उणिवा असल्या तरी आपल्या कामकाज करण्याच्या वेगळ्या पद्धतीने १७५ दिवसात त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे.
पिंपरी चिंचवडच्या आजपर्यंतच्या २४ महापौरांमध्ये दोन महापौरांची विशेष नोंद त्यांच्या वेगवेगळ्या कामांमुळे ओळखली गेली आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रकाश रेवाळे की जे महापौर पदावर आरूढ असतानाही ‘ते’ कुठे आहेत, हे त्यांच्याशिवाय कोणालाच माहित नसायचे. सर्वसाधारण सभेला दांड्या, जाहीर कार्यक्रमांना बुट्ट्या यामुळे तेव्हाचे कारभारी असलेल्या अजित पवारांनाही कपाळाला हात लावायची वेळ आली होती. तर दुसरा उल्लेख करावा मंगला कदम यांचा…! आपल्या कारकिर्दीत जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी विक्रम करून टाकला. महापौरपदाचा प्रत्येक क्षण न क्षण मंगला कदम यांनी प्रशासनाला पळवण्यात व स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात खर्ची केला. या दोन्ही महापौरांची त्या त्या काळात चर्चा झाली असली तरी विद्यमान महापौर राहुल जाधव यांनी मात्र आपली काम करण्याची स्वतंत्र स्टाईल आता निर्माण केली आहे. महापौर जाधव यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम त्यांनी शहर समजून घ्यायला प्राधान्य दिले. एखादी नववधू ज्याप्रमाणे आपल्या सासरचा परिवार, सर्वांचे स्वभाव, आणि घराची वीट न वीट माहिती करून घेते, तसे त्यांनी केले. आपल्या शहराची वेस न वेस महापौरांनी जाणून घेतली. पालिकेच्या सर्व मिळकती, शाळा, प्रभाग कार्यालये, स्मशान भूमी, क्रिंडागणे, आरक्षित जागा, उद्याने, यांचा दौरा केला. याचा परिणाम म्हणजे त्यांना येथील समस्यांची तीव्रता लक्षात आली. प्रशासनाला आदेश देणे त्यानिमित्ताने सोपे गेले. सर्व नगरसेवकांशी स्नेहबंध जुडला गेला. मागील आठवड्यात तर अचानक मध्यरात्री वायसीएमला भेट देऊन त्यांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या व्यथा समजल्या. तर लट्ठ पगार घेऊनही पालिका शाळेतील विद्यार्थी मठ्ठ दिसल्याचे पाहून त्यांनी सुमारे १३०० शिक्षकांसाठी एक दिवसाची कार्यशाळा नुकतीच घेतली. त्यासाठी चांगले तज्ज्ञ व्याख्याते बोलाविले. मास्तर सुधारला तर पोरं सुधारतील, हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. नुसती औपचारिकता नाही तर स्वतः दिवसभर या कार्यशाळेत ते शिक्षकांबरोबर ठाण मांडून बसले.
एकूणच पाहिल्या सहामाहीत तरी महापौर जाधव पास झाले आहेत. १० सप्टेंबर २०१९ ला त्यांच्या पदाची मुदत संपत आहे. त्यामुळे उरलेल्या २४५ दिवसात वार्षिक परिक्षेची चांगली तयारी त्यांना करावी लागणार आहे. महापौरपदाच्या प्रतिमेचा व प्रतिभेचा स्तर असाच उंचावत राहिला तर तोंडावर आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे फारसे चमकदार न ठरलेले पालिका सत्तेचे रुप त्यानिमित्ताने का होईना उजळण्यास मदत होईल.