पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात १२ मार्च २०२० ही तारीख एका अविस्मरणीय नोंदीची ठरेल. ज्यांच्या केवळ नावाचा उच्चार झाला तरी राज्य असो की देशातील सर्वोच्च प्रमुख हे विनम्र होतात, नतमस्तक होतात अशा मेधा पाटकर, व डॉ. बाबा आढाव या दिग्गजांनी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल पाच तास तळ ठोकला. निमित्त होते, ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या एकसष्ठी समारंभाचे..!
सामाजिक क्षेत्रातील कार्यात दिपस्तंभ असलेले मानव कांबळे यांना शुभेच्छा देण्यासाठी ही सारी मंडळी प्रथमच एकत्र आली होती. प्रखर समाजवादी व डाव्या विचारसरणीच्या मेधा पाटकर व बाबा आढाव यांच्याबरोबरच उल्का महाजन, विश्वंभर चौधरी, श्रीमंत कोकाटे, गजानन खातू, संजीव साने, ॲड. सुरेखा दळवी, महापौर उषा ढोरे, किशोर ढोकळे, बाबा कांबळे, सुभाष वारे, कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पालिका गटनेते राहुल कलाटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शिवसेना संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, महापालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, भाजपाचे नेते महेश कुलकर्णी, अशोक बँकेचे संस्थापक डॉ. अशोक शिलवंत, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, जगद्गुरू प्रतिष्ठानचे ॲड. लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेडचे नकुल भोईर, मधु जोशी यांच्यापर्यंत दिग्गज म्हटली जाणारी ही सारी मंडळी प्रथमच आपल्या लाडक्या सहकाऱ्याच्या एकसष्टीच्या समारंभाला आवर्जून झाडून उपस्थित होती. या सर्वांना ऐकणे, पाहणे व अनुभवणे ही समाजकारण तसेच राजकारणात ज्यांना यशस्वी व्हायचंय त्यांच्यासाठी शहरात चालून आलेली सोन्यासारखी संधी ठरली.
केवळ देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव असलेल्या मेधा पाटकर यांची उपस्थिती तर या कार्यक्रमाचा कळसबिंदू ठरली. तर आपले सारे आयुष्य कष्टकऱ्यांसाठी समर्पित केलेले डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षीय भाषणाने तर या कार्यक्रमाला चार चाँद लागले. तर या विचारांच्या श्रवणीय बरसातीमध्ये या सर्वांनी केलेली भाषणे ऐकून शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मानव कांबळेंच्या चाहत्यांना न्हाऊन काढले. मेधा पाटकर यांचे अभ्यासपूर्ण भाषण सर्वांना ऐकण्याची पर्वणी ठरली. आंतरराष्ट्रीय नाव असलेल्या मेधा पाटकर यांच्यातील साधेपणा, विनम्रता सर्वांना भावून गेली.
आपल्या सत्काराला उत्तर देताना मानव कांबळे यांनी, माझ्या जनआंदोलनाच्या कार्यात सर्वाधिक असा ७५ टक्के वाटा कार्यकर्त्यांचा असल्याची प्रांजळ भावना व्यक्त करत यापुढील माझे जीवन जनसेवेसाठी समर्पित असल्याचे घोषीत केले.