७७ वर्षापूर्वी देशाच्या व्हॉइसरॉय मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री असताना बाबासाहेबांनी राबविलेले या खात्याचे धोरण व नियोजन आजही लागू पडत असून आधुनिक व स्मार्टप्रणाली वापरून राज्याला ऊर्जा क्षेत्रात सशक्त व स्वयंपूर्ण करणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज ‘बातमी खास’शी बोलताना व्यक्त केला.
राज्यमंत्रीमंडळाचे खाते वाटप आज अधिकृत जाहीर झाले. ऊर्जामंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर डॉ. राऊत बोलत होते. २७ जुलै १९४२ साली व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या कार्यकारी मंडळात बाबासाहेब आंबेडकरांकडे श्रम, ऊर्जा, जलनियोजन आणि खनिज खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. आंबेडकरांच्या रूपाने देशाच्या इतिहासात प्रथमच एका अस्पृश्य व्यक्तीचा सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. हा संदर्भ आठवून डॉ. राऊत यांनी म्हटले की, आज देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राचा ऊर्जामंत्री म्हणून जबाबदारी स्विकारताना माझ्या डोळयासमोर बाबासाहेबांनी या क्षेत्रामध्ये केलेले कार्य व अभ्यासपूर्ण व पायाभूत तयार केलेला आराखडा आहे व हेच आपले रोल मॉडेल असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात क्रांतीकारक बदल होत असून वीजनिर्मिती केंद्राची कार्यक्षमता वाढविणे, त्रूटी दूर करत ऊर्जा संवर्धन करून आधुनिक व र्स्माटप्रणाली वापरत राज्याला ऊर्जा क्षेत्रात प्रगतीपथावर नेणार आहे. २०२५ साली सुमारे १४ कोटी लोकसंख्या होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात अंदाजे २ लाख ३० हजार दशलक्ष युनिट वीज लागणार असल्याने शाश्वत ऊर्जेबाबत संशोधन व शेती, उद्योग, घरगुती, व्यावसायिक, रेल्वे व इतर क्षेत्राला मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
या मोठया व महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने सोपविल्याबद्दल आमच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे मी आभार मानतो असे त्यांनी शेवटी म्हटले.