अस्वस्थता, धुसफूस, वर्चस्ववाद यावरून गेली अडीच वर्षापासून सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या चूलीतील विस्तवाच्या धगधगीने अखेर राख झटकून पेट घेतला. या आगीच्या ज्वाळांनी जरी कोणाला चटका बसत नसला तरी उडणाऱ्या ठिणग्या विद्यमान नेतृत्वालाच शह देणाऱ्या ठरल्या आहे.
पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये सध्या नवे विरूद्ध जुने असा छुपा संघर्ष सुरू झाला आहे. ‘इंग्रज आले आणि ज्याप्रकारे भारताचे राज्यकर्ते बनले’ अशाच धर्तीवर सध्या भाजपच्या जुन्यांनी आपल्या व्यथा, वेदना मांडण्यासाठी पक्षाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा विचारमंच स्थापन करून बुद्धिबळातील खेळाप्रमाणे तिरकी चाल कररत शह (चेक) दिला आहे. आता हा शह समजला तरी अडचण आणि दूर्लक्ष करून शह नाही असे समजावे तरी अडचण…! अशी अवस्था नव्याने येऊन शहरावर राज्य स्थापन करणाऱ्या भाजप नेतृत्वाची झाली आहे.
संथ गतीने वाढत असलेल्या भाजपने मे २०१४ मध्ये देशात बहुमताचे सरकार स्थापून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. मे २०१४ पूर्वीचा पिंपरी चिंचवड भाजप म्हणजे तोळामोसा जीव असलेल्या कुपोषित बालकाप्रमाणे होता. तीन नगरसेवक ही पालिका वर्तुळातील तत्कालीन भाजपची कामगिरी…! बलाढय नेतृत्वाची कायमच उपेक्षा असलेल्या या शहर भाजपमध्ये राजकारणाचा परिघ बदलणाऱ्या व आभाळ व्यापणाऱ्या नेतृत्वाचा कायमच अंधार. पंचवीस वर्षापूर्वी पुण्यात गाजलेल्या आंदेकर-माळवदकर टोळीतील नामवंत भाईंनी जेव्हा शहर भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा तर ऊर भरून फाटेस्तोवर आनंद भाजपमंडळींना झाला होता.
जेव्हापासून नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपने देशात मुसंडी मारली तेव्हापासून आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही. २०१४ साली शहरातील बलाढय व ताकदवर नेते लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्वप्नवत वाटणारा प्रवास शहर भाजपचा सुरू झाला. काँग्रेस औषधालाही राहिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस होत्याची नव्हती झाली. मात्र अंतर्गत भांडणे, शह-काटशह याचा जणू शाप लागलेल्या शहर भाजपमध्ये जुने विरूद्ध नवे यांचे मनोमीलन काही सांधेना. ‘आमच्यामुळे तुम्ही’ असे जुन्यांचे म्हणणे तर ‘तुमची हैसियत काय?’ असा नव्यांचा अप्रत्यक्ष सवाल..! या साठमारीत पालिका सत्तेची अडीच वर्षे निघून गेली. जुन्यांना राज्यमंत्री दर्जाची पदे तसेच काही शासकीय नेमणूका देऊन संधीही मिळाली. मात्र आता नेतृत्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न जुन्यांनी सुरू केला आणि ‘श्रद्धेच अटलबिहारी वाजपेयी मंच’ असे नाव देऊन आता व्यासपीठ उभारले आहे.
‘आपण गेलो नाही तर कपाळ करंटे ठरू’ अशा भितीने जुन्या निष्ठावंतानी झाडून या कार्यक्रमाला हजेरी लावली. माजी नगरसेवक राजू दुर्गे हे या मंचाचे सूत्रधार व निर्माते आहे. गंमत म्हणजे निष्ठावंत गटात नव्यांविरूद्ध टाहो फोडणारे अनेक जण विद्यमान अध्यक्षांच्या दरबारात ‘जी हुजूर’ करत असतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र आज जी काही कोंडी नव्या व जुन्यांमध्ये झाली आहे ‘ती योग्य नाही’ असेही बऱ्याच जुन्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
आता ही परिस्थिती अशा अडचणीच्या वळणावर येऊन ठेपली आहे की, वाजपेयी मंच बंद करा असेही म्हणण्याची कोणाची हिमत नाही, आणि दुसरीकडे या मंचाला ताकद दिली तरी अडचण..! अशा दुहेरी कैचीत डबल ढोलकी वाजवणारे शेकडो कार्यकर्ते सापडले आहेत. थोडक्यात नव्यांनी भाजपची संख्या वाढविली, सत्ता आणली, वलय निर्माण केले पण त्यांना जुन्यांसारखे चौकात मांडी घालून बसायला येत नाही आणि आख्खे आयुष्य विरोधी म्हणून काढलेल्या जुन्यांना आकाशात तरंगणाऱ्या सोफ्यावर बसता येत नाही असा झांगडगुत्ता सध्या येथे निर्माण झाला आहे.