विजय जगताप
अपयशाला ज्याप्रमाणे अनेक गोष्टी कारणीभूत असतात त्याचप्रकारे यशाला देखील अनेक प्रयत्न, बेरजा, गणिते, लोकांची नाडी, कल या गोष्टी हातभार लावत असतात. शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांनी मिळविलेल्या विजयाला अनेक पदर असले तरी त्यांच्या यशाला सर्वाधिक उंची जर कोणी मिळवून दिली असेल तर ती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने..! इतिहास, धर्म, आणि आक्रमक पुरूषत्व यावर जीव ओवाळून टाकणारा हा महाराष्ट्र असल्याने जेव्हा साक्षात संभाजीच्या रूपातील डॉ. कोल्हे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली त्याच दिवशी, त्याच क्षणी त्यांचा विजय निश्चित झाला.
डॉ. कोल्हे यांच्या विजयाच्या विश्लेषणाशी व भारतीय जनतेच्या मानसिकतेशी तसा खुप जवळचा संबंध आहे. आक्रमक नेतृत्व असो, आक्रमक पुरूषत्व असो, की आक्रमक राजा असो याविषयी तमाम जनतेला प्रचंड आकर्षण असते. जनतेला इतिहासातील महाराणा प्रताप जितका आवडतो तितकाच महाभारतातील कर्ण देखील प्रचंड भावतो. नाटकात श्यामची आई होण्यापेक्षा झाशीची राणी होण्यासाठी पसंती देण्याचा कल ही आपली मानसिकताच स्पष्ट करत असते. अमिताभ बच्चन सुपरस्टार सिद्ध होण्यासाठी जंजीर, दिवार, डॉन या पिक्चरमधील त्याच्या भूमिकेचा सिंहाचा वाटा होता. लोकांना प्रस्थापितांविरूद्ध झगडतानाचा, लढतानाचा अमिताभ तेव्हा आवडला आणि तो सर्वांच्या गळ्यातील ताईत झाला. तीच गोष्ट थलयव्वाची म्हणजेच रजनीकांतची…! एका फाईटीत ४० गुंडांना लोळवणारा रजनीकांत हा लोकांना त्यांच्या अपेक्षेचे प्रतिबिंब भासतो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे दोन युगपुरूष व महापुरूष म्हणजे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या जणू स्नायुंमधील रक्तवाहिन्याच…! शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या शौर्याबद्दल, पराक्रमाबद्दल एक सळसळणारा अंगार महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये १६व्या शतकापासूनच ठासून भरलेला आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या काळजाचा ठोका चुकला. इतिहासाच्या सुवर्णकाळाचे प्रतिबिंब प्रत्येकाने अमोल कोल्हेंमध्ये शोधले आणि त्याचे चीज झाले. २५ सप्टेंबर २०१७ साली ही मालिका झी टिव्हीवर सुरू झाली. अगदी पहिल्या एपिसोडपासून ते कालच्या एप्रिलमधील ५०० व्या भागापर्यंत या मालिकेची पकड बिल्कूल सैल झाली नाही. प्रचंड टीआरपी कशाला म्हणतात हे झी समूहाने अनुभवले. सेम अशीच लोकप्रियता आठ वर्षापूर्वी स्टार प्रवाह वरील शिवाजी महाराज या मालिकेच्या वेळी अमोल कोल्हेंना अनुभवायला मिळाली होती. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी कोल्हेंना शिवबंधन बांधून थेट पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख केले होते. ठाकरे कुटुंबियांना देखील कोल्हेंमधील शिवाजी महाराजांचे रूप तेंव्हा भावले होते.
संभाजी मालिका झी वर चालू असणे, मालिकेतील संभाजी अर्थातच अमोल कोल्हे निवडणूकीसाठी प्रचार करणे, तो गेटअप, तेच रूप, तीच लोकप्रियता, त्यांची संवादशैली, वर्क्तृत्वामधील विनयशीलपणा, शारिरीक बलदंडपणा यामुळे पुरूषच नाही तर महिला वर्ग देखील प्रचंड त्यांच्या फॅन बनल्या. इतकेच काय, घरातील तीन वर्षाचे मूल असो की कॉलेजयुवक असो यांच्यावरही संभाजी महाराजांचे गारूड कायम राहिले.
संपूर्ण देशात लाटेला मागे पाडणारी सुनामी ठरावी अशी महाप्रचंड जादू मोदींच्या रूपाने देशात घडली असली तरी, डॉ. कोल्हे हे राष्ट्रवादीतर्फे उभे राहिले हे तसे पाहता एक निमित्त म्हणावे लागेल. जनतेने पक्ष पाहिला नाही फक्त प्रतिमा पाहिली. हीच मेख व काळाची चाहूल शरद पवारांनी ओळखली होती. पवारांनी आपले शिलेदार दिलीप वळसे पाटील, विलास लांडे, नंतर बेरजेत समाविष्ट झालेले मंगलदास बांदल यांची एकजूट, त्यांची राजकीय गणिते, आडाखे कामाला आले. लोकांचे प्रेम इतके की, त्यांना निवडणूकीत पैसा कमी पडायला नको म्हणून गावागावात वर्गण्या गोळा झाल्या, इतकी एकरूपता, एकसंधता शिरूर मतदारसंघात यापूर्वी पहायला मिळाली नव्हती. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयी मतदारांना प्रेम असले तरी ‘आता त्यांनी थांबावे’ असा अंतर्मनाला संदेश व आवाज शिवसैनिकांकडूनच दिला गेला हे आणखी वैशिष्टय म्हणावे लागेल.
लोकांचे प्रेम, किती व कसे असू शकते हा अनुभव एक जण खासदार होण्यासाठी पुरेसा असतो हे उदाहरण यानिमित्ताने दिसून आले आहे. एकूणच ते निवडणूक लढवित असतानाच टीव्हीवरपण मालिका सुरूच असणे हा करंट इफेक्ट आणि उमेदवाराचे उत्तम वर्क्तृत्व या जमेच्या बाजूमुळे संभाजी महाराज कोरले गेले. नाही तर ग्रामपंचायतही न लढविलेले डॉ. कोल्हे थेट खासदार होणे शक्यच नव्हते.