तळेगाव दाभाडे, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ ‘धर्मवीर’ म्हणून शब्दात अडकवणे योग्य नाही. ते खऱ्या अर्थाने स्वराज्यवीर होते. स्वराज्याचे सुराज्य करताना त्यांना अनेक घराण्यांनी प्राणांची बाजी लावून साथ दिली. दाभाडे सरकार घराण्याचा त्यात मोठा वाटा आहे. सुराज्य निर्मितीत अठरापगड जाती, बारा बलुतेदार आणि मावळे अशा सर्वांचे मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे भोसले यांनी बुधवारी (दि.१५) येथे केले.
‘तळेगाव दाभाडे: इतिहास ते वर्तमान’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. तळेगाव दाभाडे इतिहास ग्रंथनिर्मिती समितीतर्फे प्रकाशित ‘तळेगाव दाभाडे: इतिहास ते वर्तमान’ या ग्रंथासह प्रभाकर ओव्हाळ लिखित ‘गावगाडा’ आणि सुरेश साखवळकर संपादित ‘तळेगाव दाभाडे इतिहास’ अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन खासदार संभाजीराजे भोसले, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे आणि दाभाडे सरकार घराण्यातील वंशजांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रंथनिर्मिती समितीचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, चंद्रसेनराजे दाभाडे, राजमाता तेजलराजे दाभाडे, माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माँसाहेब उमाराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे यांच्यासह नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, डॉ. रामचंद्र देखणे, पांडुरंग बलकवडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार भोसले यांनी मराठा इतिहासातील अनेक प्रसंगांचे संदर्भ देत सरसेनापती धुरंधर येसाजीराजे, खंडेराव दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या शौर्याची उदाहरणे दिली. केवळ ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणून सुराज्य येणार नाही. आपल्याला इतिहास माहीत नाही. तो वाचला पाहिजे. त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमानात जगला पाहिजे. नवीन पिढीला त्याची जास्त गरज आहे. पाठ्यपुस्तकातील इतिहास हा फार संकुचित असून मराठा साम्राज्याच्या इतिहासात प्राणांची आहुती दिलेल्या घराण्यांचा देखील समावेश केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या ग्रंथाच्या निर्मितीचे संकल्पक माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.
केंद्र सरकारच्या अखत्यारित ८० किल्ले आहेत. महाराष्ट्रात ४० गड किल्ले आहेत. त्यापैकी १५ किल्ले केंद्राच्या यादीत असून त्यांच्या संवर्धनासाठी दीडशे कोटी रुपये फंड यावर्षी केंद्राकडून मंजूर करून घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी यावेळी जाहीर केले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी तळेगाव दाभाडेशी संबंध आलेल्या मराठा साम्राज्यातील अनेक धुरंधर योध्याचा उल्लेख केला. तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या शौर्याचे कीर्तिमंदिर उभारावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सत्याशीलराजे दाभाडे म्हणाले, की सोशल मीडियावरील निराधार माहितीमुळे चुकीच्या इतिहासाचा प्रसार होतो, तो टाळला जावा. सत्येंद्रराजे दाभाडे यांनी कृष्णराव भेगडे आणि ग्रंथनिर्मितीत योगदान देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. देखणे, बलकवडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुरेश साखवळकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. आभार प्रा. जयंत जोर्वेकर यांनी मानले.