केवळ महाराष्ट्र नाही तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिले आहेत. अलाउद्दीन खिलजी याने ज्याप्रमाणे चितोडगडाला वेढा दिला होता अगदी तशीच आठवण यावी असे दृश्य आता मावळात दिसत आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, बारामती, पुणे येथून फौजा याव्यात इतक्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते मंडळी मावळात अवतरले असून यंत्रणा काय असते? याची साक्ष पटवून देत विजयप्राप्तीसाठी या मतदारसंघात या सर्वांनी येथे तळ ठोकण्यास सुरूवात केली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरूर या दोन मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील तीन टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले असून राज्यातील शेवटच्या या चौथ्या टप्प्यांमध्ये मावळ हा मतदारसंघ सर्वांच्या विशेष चर्चेचा व औत्सुक्याचा झाला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू व राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात आहेत. संपूर्ण पवार कुटुंबिय हे प्रचारासाठी केव्हाच मैदानात उतरले असताना आता बीड, उस्मानाबाद, लातूर, विदर्भ तसेच मराठवाडयातील नांदेड आदी भागातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते, माजी आमदार, बडे नेते, राष्ट्रवादीशी संबंधित संघटना, विशिष्ट समाजाचे तालुक्याचे मंडळ, संस्था यांचे पदाधिकारी यांनी या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रत्येक ओळखी-पाळखीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी इकडे धाव घेतली असल्याचे चित्र आहे.
संपर्क यंत्रणा व प्रभाव पडेल अशी माणसे ही राष्ट्रवादीची बलस्थाने असून साक्षात पवार घराण्यातील उमेदवार असल्याने जो तो जिवाच्या आकांताने प्रचारात उतरला आहे. आज धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, अजित दादा पवार, शरद पवार यांचे शहरात आगमन झाले आहे. शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहापर्यंत काय काय रणनिती आखली जाते हे पाहणे व अनुभवणे मोठे रंजक ठरणार आहे.
अलाउद्दीन खिलजी याने ज्याप्रमाणे राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी चितोडगडावर स्वारी केली होती, अगदी तशीच आठवण यावी अशा प्रकारची स्वारी राष्ट्रवादीने मावळसाठी करून आख्ख्या मतदारसंघाला वेढा घातला आहे. राणी पद्मावती ही खिलजीला न मिळता अजिंक्य ठरली तसे शिवसेनेचा हा गड या वेढयात अडकतो की, सुटका करून खिलजीला माघारी पाठवतो हे पाहण्यासाठी उभा महाराष्ट्र आसुसलेला आहे.