पार्थ पवार यांच्या जागी राष्ट्रवादीचा अन्य कुठलाही उमेदवार असता तर शिवसेना-भाजपने त्यास चकण्यासारखा सहज खाल्ले असते. मात्र पार्थ यांच्या प्रचाराचा विस्तार हळूहळू वाढू लागल्याने मावळची निवडणूक आता आव्हानात्मक टप्प्यात येऊन ठेपली आहे.
काय चाललंय फडात? या मालिकेच्या तिसऱ्या भागात शिवसेना-भाजप चे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा आढावा बातमी खासने आज घेतला. २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेला येथून विजय मिळाला आहे. दोन्ही वेळेस शिवसेनेचे जिंकून येणे यास तत्कालीन राजकीय स्थिती लाभदायक ठरली होती. यंदा मात्र सेनेला स्वत:ची ताकद सिद्ध करावी लागत आहे. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी तलवार म्यान केली असली तरी या दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये म्हणावी अशी एकरूपता साधलेली नाही. रणनिती आखणे, गुप्त बैठका, संघयंत्रणे चे जाळे विणणे यामध्ये दोन्ही पक्षांचे आमदार-खासदार शहरप्रमुख एकत्र सहभागी होत आहेत. सध्या तरी सेनेची सारी भिस्त भाजप व संघाच्या प्रचार यंत्रणेवर अवलंबून आहे. उमेदवार बारणे यांनी पार्थ पवार व अजित पवार यांच्याविषयी अलिकडील दोन-चार दिवसात उदगारलेली भाषा पाहता बारणेंना राष्ट्रवादीने आव्हान दिल्याचे जाणवत आहे.
मावळमध्ये बारणे सर्वाधिक श्रीमंत असल्याचे सिद्ध झाले असल्याने एक हुरूप व बळकटी कार्यकर्त्यांमध्ये जरूर आली आहे. मात्र सेना-भाजप व आरपीआय या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांची अवस्था ताकाला तर जायचे पण भांडे लपवताही येईना आणि दाखवता येईना अशी कात्रीत पडल्याची स्थिती झाली आहे.
राज ठाकरे मोदीं विरोधात ऑडिओ-व्हिजुअल रणगाडे घेऊन मैदानात उतरल्यानंतर बारणे यांचे राज ठाकरेंबाबतचे स्टेटमेंट प्रसिद्ध झाल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या तो जिव्हारी शॉट बसला आहे. किमान एक लाख मतांची ताकद आजमितीस मावळात मनसेची असल्याने हल्ला पार्थवर करायचा की मनसेवर यामुळे सेनेच्या पुढयात नुकसानच अधिक येणार आहे.
आज १९ तारखेपर्यंत तरी राष्ट्रवादी व सेना यांचा ट्रॅक समान पातळीवर आहे. जोश व रंग ना सेनेत आहे ना राष्ट्रवादीत अजून पर्यंत आला आहे. उर्वरित नऊ दिवसात कोणाची गाडी वेगाने पुढे जाते हे मोदी, राज, उद्धव, शरद पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांवर सगळा खेळ अवलंबून आहे.