मावळमधील सुमारे साडेबावीस लाख मतदारांमध्ये दलित, अल्पसंख्याक मतदारांची संख्या थोडी थोडकी नाही तर सुमारे ६ लाख इतकी आहे. त्यामुळे वंचित विकास आघाडी किती मतांचा पल्ला गाठणार, यावर मावळचा खासदार कोण होणार असे सूत्र बांधले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर २० मे २०१८ रोजी वंचित विकास आघाडीचा जन्म झाला. एक वर्षही न झालेली ही आघाडी लोकसभेच्या मात्र सर्व जागा लढवित आहे. मावळमध्ये राजाराम पाटील हे ऊरण मधील आगरी-कोळी समाजातील शैक्षणिक क्षेत्रातील उमेदवार यंदा रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने बारामतीमधील पार्थ पवार, तर शिवसेनेने पिंपरी चिंचवडमधील श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. घाटाखालील बाजू असे म्हटले जाणाऱ्या ऊरणमधून राजाराम पाटील यांनी शड्डू ठोकले आहे.
काय चाललंय फडात? या मालिके अंतर्गत आज आम्ही वंचित विकास आघाडीत नेमकं काय चाललंय? याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचारासाठी फिरत असताना वंचितच्या तंबूत तशी शांतताच आहे. मात्र कार्यकर्त्यांची संपर्क मोहिम, फोन यंत्रणा व सोशल मिडियावर चालणारा गजर मात्र वाजत ठेवण्याचे काम सुरू आहे. रॅली, मोठी सभा, याचे अजून नियोजन तर दूरच वंचितने अजून निवडणूक कचेरी देखील पिंपरी चिंचवडमध्ये उघडलेली नाही. आपण जिंकू शकू का? याबद्दल कार्यकर्ते मात्र दबक्या आवाजात ‘नाही’ म्हणतात. परंतू कोण जिंकू शकेल हे वंचित आघाडीच्या मतावर ठरू शकेल हे सांगण्यास कचरत नाही.
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेली प्रचंड श्रद्धा, निष्ठा व प्रेम वंचितच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये ठासून भरले आहे. उमेदवार असलेले पाटील हे गेली २० वर्षापासून ऊरण मधील आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांसाठी विशेषत: मच्छिमारीचे संकट, प्रकल्पग्रस्त म्हणून झालेले नुकसान यावर संघर्ष करीत असल्याने त्या भागात त्यांचे चांगले नाव आहे. आपली फाईट राष्ट्रवादीशी असल्याचे श्री. पाटील व्यक्त करत शिवसेनेला आपण स्पर्धेत मानत नसल्याचे ते सांगतात. मोदींची देशभर घसरण झाल्याचे निरीक्षण ते नोंदवतात. राष्ट्रवादीने जरी शेकापशी युती केली असली तरी शेकापचे बहुसंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विचारधारेशी एकरूप नाहीत. ते मला मतदान करतील असा विश्वास राजाराम पाटील व्यक्त करतात.
दरम्यान, वंचित आघाडीचा उमेदवार किती चालावा किंवा न चालावा यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुढील बारा दिवसात काय भूमिका घेतात यावर निकालाचे बरेचसे चित्र अवलंबून असल्याची स्थिती आहे.