मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची प्रचारयंत्रणा व इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये येत्या रविवार (ता. २१) पासून कमालीचा बदल होत आहे. पवारांच्या या घरच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचाराच्या या शेवटच्या आठवडयात आमुलाग्र बदल करण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
काय चाललंय फडात? या मालिकेच्या पहिल्या भागात आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची खबरबात देत असून उदया व परवा अनुक्रमे वंचित विकास आघाडी व शिवसेनेच्या उमेदवारांचा वृत्तांत देणार आहोत.
पार्थ अजित पवार हे नाव पिंपरी चिंचवड शहरालाच नव्हे तर मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला सर्वप्रथम माहित पडले, १८ नोव्हेंबर २०१८ या दिवशी. अजित पवारांबरोबर सांगवीमध्ये एका कार्यक्रमात त्यांचे ‘प्रमोट’ होणे हा लोकसभेच्या तयारीचा भाग असल्याची चाहूल तेव्हाच सर्वांना लागली होती.
१६ मार्चला मावळचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची मुंबईत घोषणा झाली आणि दुसऱ्याच दिवशी वाल्हेकरवाडी येथे पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणावरून ते ट्रोल होऊ लागले.
मात्र अडखळण्यावर मात करून नंतरच्या टप्प्यात त्यांनी विविध समाज घटकांच्या मेळाव्यात व बैठकांमध्ये केलेली भाषणे व मांडलेले मुद्दे प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परवा कर्जत येथे झालेल्या भाषणात कमालीचा आत्मविश्वास त्यांच्या भाषणात दिसून आला. पार्थ पवार यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रत्येक अपडेट, व ग्राऊंड लेव्हलचे रिपोर्ट संकलित करणे, त्यानुसार सुधारणा करणे, बदल करणे यासाठी दोन एजन्सी स्वतंत्रपणे काम पहात आहेत. विरोधी गटाकडून सोशल मिडियावर पार्थ पवार यांची उडविली जाणारी खिल्ली, चेष्टा, हेटाळणी यास उत्तर न देण्याची आखण्यात आलेली स्ट्रॅटेजी ही या यंत्रणेची रणनिती आहे.
वेळेचे गणित साधणे, गुणवत्ता व महत्त्व असलेले कार्यकर्ते जवळ ठेवणे, हुजरेगिरी व नुसतेच पुढे पुढे मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांपासून चार हात लांब राहणे, आखलेल्या दिनक्रमाशिवाय पाच-दहा मिनिटांचाही वेळ फूकट न घालविणे अशी काटेकोर आचारसंहिताच पार्थ व त्यांच्या टिमने बनविली आहे. फारच उत्साही असलेल्या कार्यकर्त्यांना नाराज न करण्यासाठी मग प्रचाराची रात्रीची वेळ संपल्यानंतर सवड काढणे असा अलिखित नियमच पार्थ यांनी बनवला आहे. आपल्या अखतारीतील सर्व संस्था, कंपन्या, यांचे शिपायापासून सीईओ पर्यंत सर्वांना त्यांच्या क्वालिटीनुसार जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीचे मतदान उरकल्यानंतर आता रविवारपासून (ता. २१) मावळ व शिरूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे स्वत: प्रचाराची सर्व यंत्रणा आपल्या हाती घेत आहेत. पार्थ पवार यांची उमेदवारी ही कोणाच्या हट्टासाठी देण्यात आली नसून ही उमेदवारी किती गांभीर्यपूर्वक देण्यात आली आहे, याची प्रचिती २१ ते २७ एप्रिल या काळात दिसून येईल अशी माहिती राष्ट्रवादीची यंत्रणा सांभाळणाऱ्या राज्यातील एका महत्त्वाच्या नेत्याने ‘बातमी खास’शी बोलताना दिली.