संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक चुरशीची व प्रतिष्ठेची लढत ठरणाऱ्या मावळ लोकसभेसाठी रिंगणात असलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरल्याने कार्यकर्त्याच्या अपेक्षेत व अस्वस्थतेमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पार्थ पवारांपेक्षाही आप्पा बारणे श्रीमंत असल्याचे सिद्ध झाल्याने आता ‘खिंच के ताण… लय जोरात’ असा मावळात सूर उमटू लागला आहे.
पृथ्वीवर जशी अनेक आश्चर्ये व कोडी उमटली आहेत तशी राजकारणाच्या क्षेत्रातही पवार घराण्याची आर्थिक राजकीय ताकद कायम उभ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकीत करणारी ठरत आली आहे. मावळमधून यंदा दुसरे-तिसरे कोणी नाही तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांचे नातू व पक्षातील दुसरे सर्वोच्च नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ रिंगणात आहे.
पवार घराण्याने आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी महाराष्ट्रात अनेकांना बलाढय व गर्भश्रीमंत केल्याचा इतिहास आहे. आता या घराण्याचा वंशजच रिंगणात असल्याने ताकद मग ती कुठल्याही प्रकारची असो. यामध्ये पवार कुटुंबिय कुठलीही कसूर ठेवणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. अशी स्थिती असताना परवा उमेदवारी अर्ज भरताना सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये श्री. बारणे सर्वाधिक श्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कागदोपत्री तरी पार्थ पवारांपेक्षा श्रीरंग बारणे यांनी संपत्ती आता दहा पट जास्त आहे.
आजपर्यंतचा इतिहास असा सांगतो की, निवडणूकीत पैशाचा धूर वर्षोनूवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने व नंतरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. सेना, व भाजप हे राजकीय पक्ष अलिकडे लठ्ठ झाले असले तरी यापूर्वी या दोन पक्षांनी लढविलेल्या निवडणूका आदेश, हूकूम व आज्ञेवरच असल्याने बिचारे कार्यकर्ते आळोखे-पिळोखे देऊन काम करायचे व काँग्रेस राष्ट्रवादीची आतिषबाजी बघत स्वप्न रंगवायचे.
आता सेना-भाजपचे उमेदवारही श्रीमंत सिद्ध होऊ लागल्याने आता हय-गय नाही ‘पोट गच्च तर बाणाचा तीर भरगच्च’ अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.